नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाला येताना त्यांनी शासकीय गाडीचा वापर टाळला आहे. ते स्वत:च्या गाडीने मतदान केंद्रात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता आणि मातोश्री सरिता फडणवीस यांनीसुद्धा मतदान केले. स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकशाहीचा पाया आहे, यात जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे. मतदान फक्त अधिकार नाही, तर कर्तव्यसुद्धा आहे. मतदान टाळणे म्हणजेच लोकशाहीत आपल्या कर्तव्याचे पालन न करण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. भरघोस मतदान करा, चांगले लोक निवडा, चांगली शहरं निर्माण करायची असल्यास २९ महानगरपालिकांच्या मतदारांनी जोरात मतदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
अतिशय वाईट पद्धतीने आमचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे, त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. लोकशाहीत निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची त्याचा हा प्रकार आहे. मात्र, कितीही हल्ले केले तरी आमचे कार्यकर्ते घाबरणार नाहीत.
भावनिक नाही तर विकासाचे राजकारण
राज ठाकरे यांनी बोटाला लावल्या जाणा-या शाईवर प्रश्न निर्माण केले आहेत, यावर मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व गोष्टी निवडणूक आयोग ठरवतो, यापूर्वीही अनेक वेळेला मार्कर पेन वापरला आहे. याबद्दल ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशनने याकडे लक्ष द्यावे. काही लोक उद्याचा निकाल अंदाज घेऊन नंतर काय प्रतिक्रिया द्यायची याची तयारी करीत आहेत. महाराष्ट्रात केवळ आणि केवळ विकास चालेल, महाराष्ट्राची जनता विकासाच्या पाठीशी आहे. जनता विकास डोळ्यांसमोर ठेवून मतदान करेल, असा विश्वास आहे.

