शिर्डी : प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतील सभेत त्यांच्या पक्षातून फुटून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हे भाऊसाहेब नाहीत खाऊसाहेब वाकचौरे असे म्हणत त्यांनी लोकांना आवाहन केले.
‘आपला खासदार पळालेला आहे. सापडला तर सोडू नका! आणि अजिबात परत आणू नका.’ त्याचवेळी काहींच्या रक्तात गद्दारी भरलेले असते त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वाकचौरे, अशी कडवट टीका केली. तसेच वाकचौरे जिथे जातात तिथे बट्ट्याबोळ करतात, असा घणाघाती वारदेखील त्यांनी केला. तसेच या निमित्ताने त्यांनी शहासेना आणि सुपारी सेना असा उल्लेख नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावरही टिकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी भाजपवर जहरी टीका केली.
उद्धव ठाकरे तीन दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. ठाकरे सेनेतून फुटलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात ते मतदारांची माफी मागत आहेत. त्यावेळी ते शिवसेना आणि भाजप त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्य करत आहेत. शिर्डीतील सभेतही त्यांनी फडणवीसांचा पत्ता बहुधा कापला जाणार आहे, असे सांगून २०२९ मध्ये काय होणार, याची चर्चा सुरू झाली असल्याकडे लक्ष वेधले.
तसेच या रेसमध्ये फडणवीस येऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यांचा पत्ता आताच कापण्याची सुरुवात केली आहे. त्यासाठी शाहसेनेने फोडाफोडी करणा-यांना सुपारी दिली आहे. खासदार फुटतात मग त्यांना भाजपमध्ये न घेता इतरांच्या पक्षात का पाठवले जात आहेत? हे लक्षात घ्या! महाराष्ट्रात भाजपपेक्षा शहासेनेची ताकत वाढली आहे. उद्या पंतप्रधानपदाचा निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर ते शहासेनेला मदत करतील. फडणवीसांना रोखण्यासाठी खासदार फोडण्याची शहासेनेची चाल आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
नीटचे पेपर फुटले म्हणून जंतरमंतर आंदोलन सुरू आहे, आता टीईटीचे पेपर फुटले, खासदार फुटले तरी अजून संतापाला वाचा का फुटत नाही, असा सवाल करत लातूरमध्ये शेतक-याला बैल नाही आणि आपले लोक खासदार फोडायला पैसे वापरतात. शेतक-याची बातमी आल्यानंतर सरकारने त्यांना बैल दिला. त्याऐवजी खासदार किंवा मंत्री द्यायला हवा होता, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांना वाटले ४० आमदार फुटले म्हणजे आता शिवसेना संपली, त्यांना वाटले ६ खासदार फुटले म्हणजे शिवसेना संपली. पण, शिवसेना संपत नाही, तुम्ही आमचे किती आमदार-खासदार फोडणार, असा सवाल ठाकरेंनी विचारला.
महिलांवर रोज अत्याचार होत आहेत. राज्यात मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत. मात्र, महिला अत्याचाराबाबत कुणी बोलत नाही. तरीही त्यांचे महिला आरक्षण सुरु आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न होता. आता फोडलेल्या खासदारांना घेत विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून आम्हाला पक्ष पुनर्बांधणीचा प्रश्न करणा-यांना सांगतो, भाजपला पक्ष पुनर्बांधणी करण्याची गरज आहे. त्यांना उपरे लागतात. भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरावर निखारे ठेऊन पक्ष बांधला ते आज ते गद्दारांच्या पायाखाली लोळत आहेत. म्हणून भाजपला पक्ष पुनर्बांधणीची खरी गरज आहे. भाजपला राजकारणात पोरं होत नाहीत म्हणून ते दुस-याची पोरं पळवतात, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
फोडाफोडीच्या राजकारणाला बळी पडू नका
संघाला मान्य असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछाटी सुरू आहे, हे संघाला मान्य आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला केला. तसेच भाजपला संघाची गरज नाही, जेपी नड्डा यांच्या जुन्या वक्तव्याची आठवणही त्यांनी करून दिली. मराठी माणसांत मारामा-या व्हाव्यात यासाठी या सुपारी सेना, शहासेना काढल्या आहेत. आपलेच लोक आपल्यातून फोडून आपल्या अंगावर टाकत आहेत. आपण भांडत बसणार आणि राज्य ते करणार, असे सुरू आहे, याला बळी पडू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
















