छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रवक्तेपदी राहिलेल्या प्रकाश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली.त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेकडून त्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारीही देण्यात आली. शिवसेनेचे प्रवक्ते बनताच प्रकाश महाजन यांनी अपेक्षेप्रमाणे ठाकरे बंधू आणि भाजपवर हल्लाबोल केला. भाजपला आता मुंडे-महाजनांची गरज राहिली नाही, अशा शब्दात त्यांनी सुनावलं.
प्रकाश महाजन पुढे बोलताना ठाकरे बंधूंवर टीका करत म्हणाले, तुम्ही हिंदू म्हणून कुठे आहेत, आता त्यांना मुंबईत अस्तित्व टिकवायचे आहे, असे म्हणत शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी शिवसेना आणि मनसेच्या युतीवरुन ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, भाजपवरही निशाणा साधत आपण भाजपात का गेलो नाही, भाजपने मला तीन महिने ताटकाळत ठेवलं. आता, भाजपला मुंढे-महाजनांची गरज नाही, जे आहेत त्यांना संभाळा अशा शब्दात प्रकाश महाजनांनी शिवसेनेतील प्रवेशानंतर पहिल्यांदाच भाजपवर जोरदार टीका केली.
मी भाजपमध्ये गेलो नाही, कारण त्यांनी मला तीन महिने ताटकळत ठेवले. मी त्यांची एंट्रन्स परीक्षा पास झालो नाही, पण ज्यांनी भाजपवर टीका केली ते सगळे आज भाजपात आहेत. दिनकर पाटील भाजपावर बोलले तो भाजपात आहे. भाजपच्या घराला दार नाही पण पहारेकरी आहेत हे सांगण्यासाठी मी मुनगंटीवार यांना फोन केला, पण त्यांनी उचलला नाही, असेही प्रकाश महाजन यांनी सांगितले.

