नाशिक : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून वाढलेली कमालीची थंडी आणि अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले असून, सर्वसामान्य महिलांचे आर्थिक बजेटही यामुळे कोलमडले आहे.
दरम्यान, दरवर्षी साधारण डिसेंबर महिन्यात नवीन भाजीपाला बाजारात येत असतो. मात्र, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती.
त्यामुळे भाजीपाल्याच्या विशेषत: वेलवर्गीय भाजीपाल्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीनेही जोर धरला असून, त्यामुळे घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. आवक घटल्याने बाजारभाव तेजीत असून, वेलवर्गीय भाज्यांची आवक तर साधारण २५ टक्क्यांवर येऊन ठेपल्याचे बाजार समितीने सांगितले. अजून काही दिवस तरी भाजीपाल्याचे भाव चढेच राहतील, असा अंदाज व्यावसायिकांनी वर्तविला आहे.
बाजार समितीतील आजचे दर
थंडी आणि अवकाळी पावसामुळे वांगी, काकडी, कारले, भोपळा या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. घाऊक बाजारपेठेत साधारण दर असले तरी सर्वसाधारण बाजारात मात्र यापेक्षा ३० ते ४० टक्के अधिक दराने भाजीपाला विक्री होत असतो. त्यामुळे हळूहळू भाजीपाला सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला असून, महिला वर्गाचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे.

