५ वर्षांत द्विपक्षीय व्यापार २० अब्ज डॉलर्सपर्यंत नेणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा भारत दौ-यावर आले असून, आज पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान भारत-ब्राझील यांच्यात क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ एलिमेंट्सवर करार झाला. हा करार मजबूत पुरवठा साखळी तयार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दोन्ही देश पुढील ५ वर्षांत द्विपक्षीय व्यापार २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढवण्यासाठी वचनबद्ध आहेत, असेही ते म्हणाले.
भारत आणि ब्राझिलमध्ये आज क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ एलिमेंट्ससारख्या महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी झाली. हा करार दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो जागतिक पुरवठा साखळीतील चीनवरील अवलंबित्व कमी करणे, ग्रीन एनर्जी ट्रान्झिशनला पाठिंबा देणे आणि विकसनशील देशांचा आवाज मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करतो. हा करार दोन्ही देशांना कच्च्या मालाचे निर्यातदार म्हणून पुढे जाऊन प्रोसेसिंग, व्हॅल्यू अॅडिशन आणि रिसायकलिंगमध्ये भागीदार बनवण्यावर भर देणार आहे, असे सांगण्यात आले.
चीनवरील अवलंबित्व
आता कमी होणार
भारत-ब्राझिल कराराचे मुख्य उद्दिष्ट चीनवरील अवलंबित्व कमी करणे हे आहे. विशेषत: ईव्ही बॅटरी, अक्षय ऊर्जा आणि उच्च-तंत्रज्ञान उद्योगासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे. या करारामुळे भारताची प्रक्रिया आणि शुद्धीकरण क्षमता ब्राझीलच्या संसाधनांसोबत जोडली जाणार आहे. यानुसार भारतीय कंपन्या ब्राझीलमध्ये गुंतवणूक करू शकतात तर ब्राझीलला भारतीय तंत्रज्ञान आणि बाजारपेठ प्रवेश हवा आहे.या करारामुळे स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि एआय संबंधित तंत्रज्ञानासाठी आवश्यक खनिजांचा सुरक्षित पुरवठा होण्यास मदत होणार आहे.
पहलगाम हल्ल्याचा निषेध
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी आज पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. दहशतवाद कोणत्याही धर्माशी किंवा राष्ट्रीयतेशी जोडलेला नाही, असे ते म्हणाले.

