लातूर : प्रतिनिधी
जिल्हा निर्मितीपासून ते आजतागायत काँग्रेस पक्षाने लातूचा विकास केला, असे असताना ही २०१७ च्या महानगरपालिका निवडणूकीत लातूरच्या जनतेने विकासाच्या नावाखाली मते मागणा-या भाजपाला संधी दिली. पण या संधीसाधू लोकांना संधीच सोन करता आल नाही. या संधी साधू लोकांनी मागील काळात कमावलेल्या भ्रष्ट पैशातून आता परत महानगरपालिकेची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संधी साधू लोकांना वेळीच ओळखा व त्यांना त्यांची जागा आपल्या मताच्या ताकदीतून दाखवून देत काँगेस-वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
शहरातील प्रभाग क्र. १४ मधील काँग्रेस-वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार रेणूका शिंदे, संतोष नरटे, दिपाली हविले, गणेश एसआर. देशमुख यांच्या प्रचारार्थ दि. ११ जानेवारी रोजी दादाजी कोंडदेवनगरमध्ये आयोजित सभेत माजी आमदार धिरज देशमुख बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी काशिनाथराव सायगावे होते. काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धिरज पाटील, संतोष देशमुख, डॉ. अरविंद भातांब्रे, अॅड. अजित चिखलीकर, राजेश कासार, मनोज चिखले, डॉ. अमोल शिंदे, प्रदिप कुंभार, रामभाऊ चिखले, भगवान तेलंगे, यशवंत वाडीकर, माजी नगरसेविका कविता वाडीकर, अभिजित पाटील, बाळासाहेब देशपांडे, विश्वंभर चाळे, रामदास पवार, ओम सुर्खवंशी, सुरेश शिंदे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी आमदार धिरज देशमुख म्हणाले की, काँग्रेसचे व आपले नेते विलासराव देशमुख यांच नाव घेतल्या शिवाय विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भाषणाची सुरूवात होत नाही अन् शेवट ही त्यांचं गुणगाण केल्याशिवाय होत नाही. भाजपाच्या नेत्याने लातूरात येऊन साहेबांची ओळख पुसून टाकण्याची भाषा केली. याचा लातूरात व राज्यात साहेबांवर प्रेम करणा-या प्रत्येक व्यक्तीकडून संताप व साहेबांविषयीच्या भावना समाज माध्यमातून व्यक्त होत आहेत. परवा लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या मैदानावर राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या जाहीर सभा झाल्या सभेतून त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्याचे कौतूक करत जणू त्यांच काम बघा अन् हाताच बटन दाबा, असा संदेशच दिला आहे.
या प्रभागातील पुर्वीचा नगरसेवक हा हाताच्या चिन्हावर निवडून आला होता. त्यांनी जमा केलेल्या भ्रष्ट पैशावर वकृदृष्टी पडू नये म्हणून पक्षातंर केले आहे. या प्रभागात माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून १८ कोटी ४६ लाख ६६ हजार रुपयांची जवळपास १४५ कामे झाली आहेत. प्रत्येकाच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी लढणार असून आम्ही मुळ विचार व तत्वाशी कधीही तडजोड करणार नाही, लाडक्या बहीणीचे मानधनात कधी वाढ करणार, वाढलेली महागाई कधी कमी करणार यावर सत्ताधारी बोलायला तयार नाहीत.
या प्रभागात काँग्रेस पक्षाने नव्या उमेदीचे कधी ही कोणाशी न भांडणारे, जनसामान्यांना भिती न वाटणारे उमेदवार दिले आहेत. एस. आर. काकांची आजही आठवण काढली जाते. त्यांची साहेबांना खंबीर साथ होती. साहेबांचा व त्यांच्या विचाराचा वारसा जपण्याच काम आपण सर्वांनी करावे. लातूरच्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीत जसे भाजपाला हद्दपार केले तसे या महानगरपालिकेच्या निवडणूकीत त्यांच्या सर्वच उमेदवारांना पराभूत करून काँगे्रस व वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन केले. या प्रचार सभेसाठी प्रभाग १४ मधील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

