इंफाळ : वृत्तसंस्था
मणिपूरमध्ये कुकी आणि मेईतेई समाजातील तीव्र संघर्ष संपण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ सप्टेंबर रोजी मणिपूर राज्याचा दौरा करण्याची चर्चा आहे. त्यांच्या दौ-यापूर्वी सरकारला मोठे यश मिळाले. केंद्र आणि मणिपूर सरकारने गुरुवारी (४ सप्टेंबर २०२५) कुकी-झो कौन्सिल सोबत एक नवीन करार केला आहे, ज्याअंतर्गत सर्व पक्षांनी राज्याची प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग-२ उघडण्यास सहमती दर्शविली आहे.
गेल्या काही दिवसांत केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी आणि केझेडसीच्या शिष्टमंडळात अनेक बैठका झाल्या. मणिपूरमध्ये कायमस्वरुपी शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी संवादाद्वारे तोडगा काढण्याच्या गरजेवरही तिन्ही पक्षांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील संघर्ष कायमचा संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आवश्यक वस्तूंची सहज उपलब्धता विस्थापित कुटुंबे आणि मदत छावण्यांमध्ये राहणा-या नागरिकांच्या अडचणी कमी करेल.
करार एक वर्षासाठी प्रभावी
नवी दिल्लीत गुरुवारी गृह मंत्रालय, मणिपूर सरकार, कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन (केएनओ) आणि युनायटेड पीपल्स फ्रंट (यूपीएफ) यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी संवादाद्वारे तोडगा काढण्याची गरज यावर तिन्ही पक्षांनी सहमती दर्शविली.
















