मुंबई : प्रतिनिधी
देशासह राज्यात मतचोरीच्या आरोपावरून खळबळ उडाली आहे. यावरून सातत्याने विरोधकांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर आरोप केले आहेत. यातच आता मतदार यादीतील घोळासंदर्भात येत्या १ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांचा मोर्चा निघणार आहे.
या मोर्चाचे नियोजन कसे असणार आहे, याबाबतची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली आहे.
‘‘निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबतचा सत्याचा मोर्चा शनिवार, १ नोव्हेंबर रोजी निघणार आहे. लोकांना सत्य कळावे यासाठी विरोधी पक्षाने, महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, मनसे आणि जे जे सर्व या गोष्टींच्या विरोधात आहेत, मतदार देखील मोर्चात सामील होतील,’’ असे अनिल परब यांनी सांगितले आहे.
हा मोर्चा दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू होईल. मेट्रो सिनेमा मार्ग मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल. मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दुपारी १ ते ४ या वेळेत मोर्चा निघणार आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
शरद पवार देखील मोर्चाला उपस्थित राहणार
‘‘याबाबत पोलिसांना भेटलो असून सूचना घेतल्या आहेत. या मोर्चाचे रूट प्रसिद्ध केले आहेत. उद्या क्यूआर कोड पाठवू. म्हणजे लोकांची व्यवस्था होईल. मुंबईवरून येणा-या दोन लोकांची वाहन व्यवस्था राहील. मतचोरीबाबत प्रमुख नेते पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील. आघाडीचे नेते आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, डाव्या पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील आणि मोर्चाला मार्गदर्शन करतील,’’ असे अनिल परब म्हणाले. शरद पवार देखील मोर्चाला उपस्थित राहणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

