उदगीर : प्रतिनिधी
सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक लोकप्रतिनचे धोरण निवडणूक काळात मतांचा बाजार मांडून नंतर शासकीय योजना हडप करणे. या मंडळींना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना केले.
उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे नळगीर आणि निडेबन जिल्हा परिषद गट तसेच नागलगाव व शिरोळ पंचायत समिती गणातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उदगीर तालुक्यातील नागलगाव या ठिकाणी नळगीर आणि निडेबन जिल्हा परिषद गट, गण तसेच नागलगाव व शिरोळ पंचायत समिती गणातील काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा पार पडली. उदगीर तालुक्यातील नळगीर जिल्हा परिषद गटातील सौ. रुपाली प्रशांत गायकवाड, पंचायत समिती गणातील श्री.विलास धळप्पा गताटे आणि नागलगाव पंचायत समिती गणातील सौ. शिल्पा शक्ती केवडे तसेच निडेबन जिल्हा परिषद गटातील रणजित मल्हारी पाटील व गणातील सौ. मनीषा संदीप कोयले व शिरोळ पंचायत समिती गणातील श्रीकृष्ण वामन आडे या काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा झाली.
उदगीरमध्ये हप्ता वसुली आणि अवैध धंद्यांना पेव
यावेळी बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी स्थानिक आमदार आणि सत्ताधा-यांवर गंभीर आरोप केले. उदगीरमध्ये आज मटका, गुटखा विक्री आणि जमिनी बळकावण्याचे प्रकार उघडपणे सुरू आहेत. यातून मोठी हप्ता वसुली सुरू असून, यामुळे लातूरच्या सुसंस्कृत पॅटर्नला गालबोट लागत आहे. मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीच्या गप्पा मारल्या, पण एकाही स्थानिक तरुणाला तिथे नोकरी मिळाली नाही. उदगीरमध्ये एकही नवीन उद्योग हे लोक उभे करू शकले नाहीत. उदगीरला मूळ उदगीरच्याच नेतृत्वाची गरज आहे, असे सांगीतले.
शेतक-यांचा पाठीराखा: मांजरा परिवार माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी शेतकरी हिताचा उल्लेख करताना त्यांनी आकडेवारीच मांडली. राज्यात उसाला ३ हजार रुपयांपेक्षा जास्त भाव देणारे ५६ कारखाने आहेत, त्यापैकी ६ कारखाने एकट्या मांजरा परिवारातील आहेत. शेतक-यांच्या मुलांचे शिक्षण असो वा मुलीचे लग्न, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच शून्य टक्के व्याजाने पाठीशी उभी राहिली आहे. आम्ही कामावर मत मागतो, विरोधकांसारखे रात्री-अपरात्री पैसे वाटून मते विकत घेत नाही.
लाडकी बहीण योजनेवरून भगिनींना आश्वस्त केले विरोधकांकडून केल्या जाणा-या अफवांचा समाचार घेताना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले, लाडकी बहीण योजना किंवा इतर कोणतीही शासकीय योजना ही कुण्या एका पक्षाच्या खिशातील पैशातून चालत नाही. हा पैसा जनतेच्या टॅक्सचा आहे. त्यामुळे सत्ता बदलली तरी योजना बंद होणार नाही. कोणत्याही धमक्यांना घाबरू नका, आपल्या गावाच्या विकासासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन केले.
प्रारंभी यावेळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उजनी येथील सभेचा शुभारंभ करण्यात आला. या सभेला लातूरचे प्रभारी श्रावण रॅपनवाड, प्रशांत गायकवाड, कल्याण पाटील, शिवाजी हुडे, शिलाताई पाटील यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

