अंतरवाली सराटी : प्रतिनिधी
सरकारने सगळ्यांवर अन्याय केला आहे. धनगरांवर अन्याय केला, मायक्रो ओबीसींचे वाटोळे केले, बंजारा समाजाचे वाटोळे केले, आदिवासींचा उद्ध्वस्त कार्यक्रम लावला आणि आता दलित-मुस्लिमांचाही कार्यक्रम लावून टाकला आहे. ही जी खदखद आहे, ती कुठेतरी बाहेर काढावी यासाठी २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा एकत्र जमण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
जरांगे पाटील म्हणाले, बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठा समाज उद्ध्वस्त करण्याचे ठरवले आहे. त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केला आहे आणि मराठ्यांवर जो अन्याय करण्याचे ठरवले आहे, तो आपल्याला मोडून काढावाच लागेल. त्यांना २८ तारखेपर्यंत वेळ दिला आहे, त्यानंतर पुढची रणनीती आपण ठरवू. पण मराठ्यांच्या लेकरांचे एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द होऊ द्यायचे नाही आणि जाऊ द्यायचे नाही.
ज्यांना कुणबी नोंदी सापडूनही अधिका-यांनी प्रमाणपत्रे दिली नाहीत. ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली, पण अधिकारी जाणीवपूर्वक जात पडताळणी देत नाहीत. ज्यांनी कुणबी कोट्यातून अॅडमिशन घेतले आहे, पण व्हॅलिडिटी नसल्यामुळे अडचण येत आहे. ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी मधून निवड होऊनही ज्या उमेदवारांना शासनाने अद्याप नियुक्तिपत्रे दिली नाहीत. सारथी (आणि अण्णासाहेब पाटील महामंडळांतर्गत ज्यांचे व्याज परतावे प्रलंबित आहेत. या सर्व घटकांनी आपले अर्ज घेऊन २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत यायचे आहे. जोपर्यंत नियुक्ती आणि कामे मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत इथून कुणीही माघारी जायचे नाही, असे स्पष्ट मत जरांगे यांनी व्यक्त केले.















