नाशिक : महात्मा फुले यांच्या पुतळा विटंबन प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पत्र पाठवले आहे. तेलंगणात सामाजिक विचारांवर हल्ला झाला असून या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
महात्मा फुले यांच्या पुतळा विटंबन प्रकरणावर केंद्रीय मंत्री अमित शहांकडे तातडीच्या कारवाईची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर हल्ला म्हणजे सामाजिक समतेवरच घाला आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले. त्यामुळे या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत भाष्य केले आहे. अशा पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना होणे ही घटना चुकीची आहे. महात्मा फुले देशाची अस्मिता आहेत. जे कोणते सरकार असेल त्या सरकारने चौकशी करायला हवी, भूषणवर कारवाई करायला हवी, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे.

