लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर आणि परिसरात शनिवार, ८ जून रोजी रात्री आलेल्या वादळी वारे, पाऊस आणि विजेच्या कडकडाटामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याच दिवशी रात्री १२ वाजल्यानंतर आलेल्या वादळी वा-यामुळे प्रभाग क्रमांक १५ मधील कानडे हॉस्पिटल परिसरात अंधोरीकर यांच्या घरावर जवळपास २५ ते ३० फूट लांबीची मोठ्या झाडाची फांदी पडली. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि ही फांदी चौकातील रस्त्यावर पडल्याने वाहतूकही ठप्प झाली होती. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या कार्यालयाच्या पाठपूरावामुळे वाकलेले खांब व लोंबणा-या तारा दुरुस्त करून महावितरणने काही तासातच वीजपुरवठा सुरळीत केला.
वादळी पावसामुळे निर्माण झालेल्या या आपत्कालीन परिस्थितीची माहिती मिळताच, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या कार्यालयाने जराही वेळ न घालवता तात्काळ महावितरण विभाग आणि संबंधित अभियंत्यांशी संपर्क साधला. या परीस्थीतीची माहीती दिली, महावितरणने तातडीने रात्रीपासूनच सुरक्षिततेच्या दृष्टीने काही आवश्यक ठिकाणी वीजपुरवठा बंद ठेवला होता. ९ जून रोजी सकाळी ६ वाजता माजी मंत्री आमदार देशमुख यांच्या कार्यालयाने पुन्हा एकदा महावितरण आणि मनपा प्रशासनाशी संपर्क साधून यावर तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली. आमदार देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे मनपा आणि महावितरण प्रशासनाने तत्परतेने पाऊले उचलली. मनपा प्रशासन, अग्निशमन दल आणि महावितरण यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळे झाडाच्या पडलेल्या फांद्या पूर्णपणे बाजूला करण्यात आल्या. यामुळे सदरील रस्ता वाहतुकीसाठी त्वरित मोकळा झाला.
तसेच वाकलेले खांब व लोंबणा-या तारा दुरुस्त करून महावितरणने काही तासातच वीजपुरवठा सुरळीत केला. आता प्रभाग क्रमांक १५ मधील वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत झाला आहे. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या संकटकाळात तातडीने कार्यवाही करण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.