लातूर : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील मौजे टाका येथील १२ वर्षीय विद्यार्थिनीचा जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे दि. ४ जानेवारी रोजी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेवून याप्रकरणी पिडीत कुटूंबाला तत्परतेने न्याय मिळावा यासाठी विविध मागणीचे निवेदन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले. यावेळी पाटोळे कुटूंबातील सदस्यांनी पोलीस अधीक्षक यांना तपासातील त्रुटी बाबत माहिती दिली. मृत विद्यार्थिनी ही अभ्यासात अत्यंत हुशार व होतकरू असल्याची माहिती तिच्या पालकांकडून देण्यात आली आहे.
या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी धिरज विलासराव देशमुख यांनी पुढील प्रमुख मागण्या निवेदन व चर्चेदरम्यान मांडल्या संबंधित शाळेतील मुलींच्या वसतिगृह व्यवस्थापनाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचा-यांवर कठोर कारवाई करावी. या गुन्ह्याच्या तपासासाठी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिका-यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी शासन स्तरावर तातडीची कार्यवाही करावी. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीस सहज जामीन मिळू नये यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता नेमावा. पीडित पाटोळे कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शासनाने आवश्यक ती सर्व तजवीज करावी, अशी ठाम मागणी यावेळी धिरज विलासराव देशमुख यांनी केली.

