महाराष्ट्रात दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनची वाट पाहिली जाते. यंदा नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) आपल्या नियोजित वेळेनुसार तळकोकणात दाखल झाल्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु हवामान विभागाच्या ताज्या अंदाजाने हा आनंद चिंतेत बदलला आहे. मान्सून कोकणात दाखल झाला असला तरी पुढील १० दिवसांत तो महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात हुलकावणी देण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे यंदा खरीप हंगामातील पेरण्या लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून शेतक-यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अधिकृत अहवालानुसार ६ जून रोजी मान्सूनने अत्यंत सकारात्मक प्रगती केली. अरबी समुद्राचा पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटक, दक्षिण कोकण, आंध्र प्रदेशचा काही भाग तसेच बंगालच्या उपसागराच्या बहुतांश क्षेत्रात यशस्वी आगेकूच करून मान्सून कोकणात दाखल झाला. ‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार सध्या मान्सूनची केवळ ‘अरबी समुद्राची शाखा’ अतिशय सक्रिय आहे. ही शाखा सक्रिय असल्यामुळे पश्चिम किनारपट्टीला आणि उत्तर कोकणासह संपूर्ण किनारपट्टीच्या भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. या भागात आगामी काही दिवसांत चांगला आणि समाधानकारक पाऊस पडेल मात्र देशाच्या अंतर्गत भागात मान्सूनला खेचून नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ‘बंगालच्या उपसागराची शाखा’ सध्या पूर्णपणे निष्क्रिय आहे. परिणामी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मान्सूनची वाटचाल अत्यंत मंदावलेली आणि संथ राहण्याचा अंदाज आहे. ज्येष्ठ संशोधन शास्त्रज्ञ अक्षय देवरास यांनी मान्सूनच्या प्रवासाबद्दल चिंताजनक अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते ८ जूननंतर मान्सूनची पुढची गती पूर्णपणे थांबण्याची शक्यता आहे. या मागचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलत असलेली हवामान यंत्रणा. वायव्य अरबी समुद्र आणि त्याला लागून असलेल्या वाळवंटी प्रदेशातून सध्या भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर कोरडी हवा येत आहे. ही कोरडी हवा महाराष्ट्राच्या वातावरणात प्रवेश करणार असून ती हवेतील संपूर्ण दमटपणा आणि आर्द्रता शोषून घेईल.
कोरड्या हवेच्या या आक्रमणामुळे वातावरणात कमालीची स्थिरता निर्माण होईल आणि ढग तयार होण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागेल त्यामुळे ८ जूननंतर राज्यातील पाऊस काही काळासाठी पूर्णपणे गायब होऊ शकतो. तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमालीचा मंदावणार आहे. हवामान विभागाने जरी पुढील ४८ ते ७२ तासांत महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे म्हटले असले तरी मुंबई आणि पुण्यासाठी कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. मान्सूनने जरी दक्षिण कोकणातून राज्यात प्रवेश केला असला तरी सध्या पावसाची खरी सक्रियता विदर्भात पहायला मिळत आहे. तेथे हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी अलर्ट जारी केले आहेत. ८ जून रोजी गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. ९ जून रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
पुणे ते कोल्हापूर आणि रायगड ते सिंधुदुर्ग दरम्यान पुढील २ दिवसांत ढगांच्या गडगडाटासह मान्सूनपूर्व वादळी पाऊस पडू शकतो. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात दुपारनंतर स्थानिक हवामान बदलामुळे ढग येतील आणि विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल; परंतु हा पाऊस अत्यंत मर्यादित भागापुरता मर्यादित असेल. हा पाऊस पेरणीसाठी पोषक ठरेल अशी सद्यस्थिती नाही. १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागात कमाल तापमान राहील. मराठवाड्यात तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहील. उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि खान्देशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवले जाईल. राज्यातील या गंभीर हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाला सतर्क केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, किमान १५ जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी आहे. कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. एकंदरीत, यंदा मान्सूनचे आगमन वेळेत झाले असले तरी भौगोलिक आणि वातावरणीय बदलांमुळे त्याचा पुढील प्रवास तात्पुरता खंडित झाला आहे.
१५ तारखेच्या पुढील हवामानाचा अंदाज अद्याप वर्तवण्यात आलेला नाही त्यामुळे शेतक-यांनी हवामान खात्याच्या अधिकृत सूचनांचे पालन करून, घाईघाईने पेरणी न करता संयम बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ पाऊस पडणे म्हणजे मान्सून दाखल झाला असे मानले जात नाही. मान्सूनच्या अधिकृत आगमनाची घोषणा करण्यासाठी भारतीय हवामान विभागाला काही वैज्ञानिक निकषांचा आधार घ्यावा लागतो. मान्सून हा भारतातील खरीप हंगामातील शेतीचा मुख्य घटक आणि शेतक-यांच्या संपूर्ण वर्षाच्या आर्थिक नियोजनाचा पाया असतो. शेतकरी पेरणी करण्यासाठी मान्सूनच्या पावसाची वाट बघत आहेत; पण आता पाऊस लांबणीवर पडल्याने त्यांचे टेन्शन वाढणे साहजिक आहे. सध्या तरी मान्सूनच्या आगमनाबाबत उलट-सुलट बातम्यांचा पाऊस पडतो आहे.
















