जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील मर सांगवी येथे दि ३ नोव्हेंबर रोजी शेताकडे कापूस वेचण्यासाठी जात असताना माय व लेकीचा पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला होता . सुलाळी येथील उच्च पातळी बंधा-याची अचानक दारे उघडल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला व दोघीही वाहून गेल्या. कुठलीही पूर्वक कल्पना मिळता दारे उघडून नदीमध्ये पाणी सोडल्यामुळे सदरील मायलेकीचा मृत्यू झाला.
पाणी सोडणा-या पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा कुटुंबीयांनी तसेच नातेवाईकांनी घेतला होता. तसेच रात्री उशिरापर्यंत मृतदेह जाग्यावरून हलवला नव्हता. अखेर तहसीलदार राजेश लांडगे यांनी सदरील पाणी सोडणा-या अधिका-यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या दोघींचा ही मृतदेह जळकोट येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आले . यानंतर दि ४ नोव्हेंबर रोजी ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन झाले व दुपारी ३ वाजता या दोघीही मायलेकीवर एकाच चितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .
जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथील कौशल्या अजय वाघमारे वय ३५ व रुक्मिणी अजय वाघमारे वय १२ या दोघी मायलेकी मरसांगवी येथीलच एका शेतामधील कापूस वेचण्यासाठी मजुरीने जात होत्या. कापूस वेचण्यासाठीचे शेत नदीपलीकडे होते. शेताकडे जात असताना नदीमध्ये पाणी कमी होते मात्र तिरू नदीमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे या दोघीही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्या. या मायलेकीच्या मृत्यूला जबाबदार असणा-या अधिका-यावर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक तसेच कुटुंबीयांनी केली होती. ती मागणी मान्य झाल्यानंतर दुस-या दिवशी तब्बल ३० तासानंतर मयत मायलेकीवर अंत्यसंस्कार करण्यात आले .

