ठाणे : प्रतिनिधी
पालघरमधील शेतक-याने न्याय मिळवण्यासाठी अनोखं आंदोलन केल्याची घटना घडली आहे. मोखाडा तालुक्यातील शेतक-याची म्हैस मृत झाल्यानंतर बँकेने विम्याची नुकसान भरपाई थकवली. याप्रकरणी न्याय मागण्यासाठी शेतक-याने मृत म्हशीला बँकेसमोर आणत आंदोलन केले आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोखाडा तालुक्यातील टाकपाडा गावातील पशुपालक शेतकरी नवसु दिघा यांनी आपल्या पारंपरिक शेतीला जोडव्यवसाय म्हणून सन २०२२ मध्ये बँक ऑफ बडोदा या मोखाडा शाखेतून जवळपास बारा लाखांचे कर्ज घेतले. या कर्जातून दहा दूधाळ म्हशी खरेदी केल्या तसेच चोला मंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीकडून या म्हशींना भविष्यात काही समस्या उद्भवल्यास बँकेकडून विमा कवच सुद्धा घेतले होते. मात्र म्हैस खरेदी केल्यानंतर वर्ष-दोन वर्षांत त्यांच्या तबेल्यातील दोन म्हशी मेल्या.
यातली पहिली म्हैस २०२३ मध्ये मेली आणि दुसरी म्हैस ३० नोव्हेंबर २०२५ रोजी मृत्युमुखी पडली आहे. मात्र विमा काढलेला असतानाही मोखाडा बँक ऑफ बडोदा शाखेच्या आडमुठ्या कर्मचा-यांमुळे दोन वर्षांपूर्वीचे नुकसान भरपाईचे पैसे नवसु दिघा यांना मिळालेले नाहीत. आता मेलेल्या म्हशीचे पण पैसे मिळणार नाहीत म्हणून दिघा यांनी आपली मेलेली म्हैस ट्रॅक्टरमध्ये आणून बँकेच्या समोर आणून ठेवली. एकतर मला इन्शुरन्सचे पैसे द्या नाहीतर तुम्ही दिलेली म्हैस परत घेऊन टाका अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे काहीकाळ बँकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी येथे पोलिस प्रशासनही तैनात होते.
मोखाडातील बँक ऑफ बडोदा शाखेतील कर्मचा-यांकडून नेहमी ग्राहकांची फसवणूक केली जाते असा आरोप सुध्दा यावेळी शेतक-यांनी केला. त्याचप्रमाणे दोन वर्षांपूर्वी घोसाळी गावातील शेतकरी मधू माळी,गुंबाडपाडा गावातील शेतकरी आंबेकर यांनी देखील बँक ऑफ बडोदा शाखेतून कर्ज घेऊन म्हशी खरेदी केल्या होत्या.
त्यांच्या म्हशी मटन दीड वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे, तरी सुद्धा त्यांना ही विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. बँकेच्या या ढोबळ कारभारामुळे संतप्त झालेल्या काही पशुपालक शेतक-यांनी त्यामुळे बँक ऑफ बडोदा शाखेतील कर्मचा-यांकडून अशीच जबरदस्ती चालू राहिली तर आत्महत्या करण्याचा विचार करावा लागेल असा इशारा बँकेला दिला आहे.















