मुंबई : प्रतिनिधी
यंदा विद्यार्थ्यांना कडक उन्हात परीक्षा द्यावी लागणार आहे, कारण शिक्षण विभागाने शालेय परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये परीक्षा पूर्ण करून एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास झाला नव्हता. पण यंदा एप्रिलमध्ये परीक्षा घेतल्या जाणार असल्याने कडाक्याच्या उन्हात विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. या निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केला असून विद्यार्थी आणि पालकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.
यंदा एप्रिलमध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये वार्षिक परीक्षा घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परीक्षा एप्रिलमध्ये घेतल्यामुळे त्यानंतर शिक्षकांनाही पेपर तपासणे व निकाल तयार करण्यासाठी फार कमी कालावधी मिळणार असल्याने त्यांच्यावर प्रचंड ताण असेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शिक्षक संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. गेल्यावर्षी राज्य मंडळाने सीबीएसई मंडळाच्या पद्धतीनुसार आपल्या शाळांच्या परीक्षा मार्चमध्ये घेऊन एप्रिलमध्ये शाळा सुरू करून मेमध्ये विद्यार्थ्यांना सुटी देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या होत्या. पण यंदा या सूचनांना केराची टोपली दाखवली आहे. ते रद्द करून संपूर्ण एप्रिलमध्ये परीक्षा घेण्याचे शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.
शिक्षक संघटनांचा विरोध
भर उन्ह्यात एप्रिलमध्ये परीक्षा घेणार असल्याने उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शैक्षणिक कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शिक्षण संघटनांनी त्याला विरोध केला आहे. मार्चमध्ये वार्षिक परीक्षा पूर्ण कराव्यात, एप्रिलमध्ये मार्गदर्शन वर्ग घेण्यात यावे, परीक्षा नियोजनाचे अधिकार पूर्वीप्रमाणे मुख्याध्यापकांना द्यावेत, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

