मुंबई : प्रतिनिधी
भारतीय क्रिकेटपटू यजुवेंद्र्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. यजुवेंद्र चहल आणि धनश्री यांनी कोर्टात माहिती दिली की, गेल्या १८ महिन्यांपासून ते विभक्त राहत आहेत. परंतु ‘द ५०’ या रिअॅलिटी शोमध्ये धनश्री आणि यजुवेंद्र्र चहल एकत्र सहभागी होतील, असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.
यजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा एका रिअॅलिटी शोमध्ये एकत्र दिसू शकतात. घटस्फोटानंतर दोघेही कधीच एकत्र दिसले नाहीत, मात्र या शोच्या माध्यमातून एकत्र येण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे.
कोरोनाच्या दरम्यान यजुवेंद्र चहल याने धनश्रीकडे डान्स क्लास लावला आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
काही दिवस डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. चार वर्षे दोघांमध्येही सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. त्यानंतर अचानक यांच्या घटस्फोटाची तूफान चर्चा रंगताना दिसली आणि त्यांनी घटस्फोट घेतला. मात्र, घटस्फोट घेण्याचे नेमके कारण काय ते कळू शकले नाही. यजुवेंद्र्र चहल याला आपल्या कुटुंबासोबत हरियाणात राहायचे होते. पण धनश्री वर्मा हिला मुंबईत राहायचे असल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
धनश्री वर्मा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर यजुवेंद्र चहल हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसला. फक्त सक्रिय नाही तर एका आरजेसोबतही त्याचे नाव सतत जोडले जात होते. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगितले गेले. आरजे महवशसोबत यजुवेंद्र अनेकदा स्पॉट देखील झाला. यजुवेंद्र चहल याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना धनश्री वर्मा दिसली. धनश्री सोशल मीडियावर सक्रिय असून खास व्हीडीओ शेअर करतेय.
आता घटस्फोटाच्या ११ महिन्यांनंतर धनश्री वर्मा आणि यजुवेंद्र चहल एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून यजुवेंद्र चहल भारतीय क्रिकेट संघात परतण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यापूर्वी तो या शोमध्ये दिसला. ‘द ५०’ प्रीमियर १० फेब्रुवारी रोजी भारतात होईल. जिओ हॉटस्टारवर प्रसारित होईल.

