शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
येरोळ गट व गणात होणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर आबा जाधव यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या दरम्यान मतदारांकडून काँग्रेस उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जनतेचा कौल स्पष्टपणे काँग्रेसच्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी काँग्रेसचे स्थानिक नेते उपस्थित होते.
येरोळ गट उमेदवार शितल रमेश सोनवणे, येरोळ गण अहिल्याबाई प्रभाकर बंडगर, हिप्पळगाव गण ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ येरोळ गट व गणातील विविध गावांमध्ये झालेल्या प्रचारसभा, बैठका व मतदार संवाद कार्यक्रमांदरम्यान शेतकरी, युवक, महिला व सर्वसामान्य नागरिकांनी काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला आहे. मूलभूत सुविधा आणि स्थानिक पातळीवरील रखडलेले विकासकामे पुर्ण करण्याबाबत तीन ही उमेदवार काम करतील असे सांगितले.
काँग्रेस पक्षाने नेहमीच शेतकरी, कष्टकरी व सामान्य माणसांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले असून पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगारनिर्मिती यांसाठी ठोस विकासात्मक धोरण राबवण्याची भूमिका घेतली आहे. याच विकासाभिमुख विचारसरणीला मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना मधुकर आबा जाधव यांनी सांगितले की, येरोळ गट व गणाचा सर्वांगीण विकास हाच काँग्रेसचा मुख्य अजेंडा आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता पारदर्शक व लोकाभिमुख कारभार केला जाईल त्यामुळे येत्या निवडणुकीत येरोळ गट व गणातून काँग्रेसचे उमेदवार दणदणीत विजय मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

