23.5 C
Latur
Friday, May 23, 2025
Homeसंपादकीययोग्य माहिती महत्त्वाची!

योग्य माहिती महत्त्वाची!

‘ऑपरेशन सिंदूर’ या अत्यंत महत्त्वाच्या लष्करी कारवाईबाबत घेतलेली संयुक्त पत्रकार परिषद ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच माहितीच्या पारदर्शकतेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल ठरली आहे. या परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, हवाई दलातील अधिकारी व्योमिका सिंह आणि लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी उपस्थित राहून जनतेसमोर अधिकृत माहिती मांडली. हे तिघेही आपापल्या क्षेत्रातील अत्यंत अनुभवी अधिकारी असून, त्यांनी संयमित आणि स्पष्ट भाषेत ऑपरेशनच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल माहिती दिली.

अशा संवेदनशील घडामोडीच्या वेळी सरकार आणि लष्कराकडून थेट संवाद साधणे हे लोकशाहीचे बलस्थान आहे. अफवांना आळा घालण्यासाठी आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी ही पत्रकार परिषद महत्त्वाची ठरली. माध्यमांनीही ही जबाबदारी लक्षात घेऊन अधिकृत सूत्रांवर आधारित आणि संवेदनशीलतेची जाण ठेवून बातम्या द्याव्यात, अशी अपेक्षा आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे पहलगाममध्ये झालेल्या आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने पाकला एक प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानच्या सेना व सामान्य नागरिकांवर हल्ला न करता फक्त अतिरेकी तळ नष्ट केल्याने जगातून या कारवाईला पाठिंबा मिळत आहे.दहशतवाद्यांना भारतात येण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. जगातल्या अतिरेक्यांना व जिहादींना आपला विचार बदलायला लावणारी ही कारवाई भारताने केली आहे. यापूर्वी भारताने अशाच दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाया केल्या आहेत.

तरीसुद्धा पाकिस्तान व दहशतवादी यांच्यावर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळेच भारताला अशा मोठ्या कारवाया कराव्या लागल्या. जगातील अनेक देश भारतासोबत उभे राहिल्याने पाकिस्तान पाठिंब्यासाठी धडपडत आहे. पाकिस्तानवर या कारवाईचा काहीच परिणाम न झाल्यास त्यांना भविष्यात आणखी मोठ्या कारवायांना सामोरे जावे लागेल. मंगळवारी रात्री उशिरा भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हवाई हल्ले केले. या कारवाईत दहशतवादी तळांचे भारी नुकसान करण्यात आले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताचे हे निर्णायक प्रत्युत्तर होते. सुरक्षा दलाने हे सर्जिकल ऑपरेशन अतिशय काळजीपूर्वक आणि अचूक नियोजनासह पार पाडले. भारताच्या या कृतीमुळे दहशतवादाविरुद्धची कठोर भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील तणाव वाढण्याची शक्यता असून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे पडसाद उमटणार यात शंका नाही. लष्कराच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल त्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे. भारताच्या संरक्षण क्षमतेचा झंझावात पुन्हा एकदा जगासमोर स्पष्ट झाला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई केवळ एक लष्करी कृती नव्हे, तर भारताच्या दृढ इच्छाशक्तीची आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील सजगतेची ठोस ओळख आहे. या ऑपरेशनने पाकिस्तानला न केवळ अद्दल घडवली तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या निर्णायक नेतृत्वाची छाप उमटवली. पाकिस्तानने गत काही वर्षांत सातत्याने भारतविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला आहे. सीमारेषेवर घुसखोरी, दहशतवादाला खतपाणी घालणे आणि शस्त्रसज्ज कट रचणे हे सारे प्रकार वारंवार भारताच्या संयमाची परीक्षा घेत होते. मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’ने अशा कुकर्मांना सडेतोड उत्तर दिले आहे. या ऑपरेशनची अचूक योजना, गुप्तचर विभागांची कार्यक्षमता आणि लष्कराची धारदार कारवाई या सा-या गोष्टींनी यशाला चार चाँद लावले. हे केवळ शस्त्रबळाचे प्रदर्शन नव्हते तर एक स्पष्ट संदेश होता. भारत आपल्या सार्वभौमत्वावर कोणताही आघात सहन करणार नाही! या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा मानसिक आणि सामरिक धक्का बसला आहे. त्यांच्या मोहिमांची दिशा भांबावली, भरकटली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांची विश्वासार्हता आणखी ढासळली आहे. या घटनेने इतर देशांनाही भारताच्या सुरक्षाविषयक दृष्टिकोनाची जाणीव करून दिली आहे.

आपल्या सैनिकांचे धैर्य, केंद्र सरकारचे ठाम नेतृत्व आणि जनतेचा लष्करावर असलेला विश्वास हे सारे घटक ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचे खरे शिल्पकार आहेत. भारत शांतताप्रिय देश असला तरी त्याच्या संयमाची परीक्षा घेणा-यांना सडेतोड उत्तर द्यायला तो सदैव तयार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्याचेच एक सशक्त उदाहरण आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी ज्याप्रकारे भ्याड आणि अमानुष हल्ला करून निरपराध पर्यटकांची हत्या केली ते पाहता त्याचे प्रत्युत्तर देणे भारताला भाग होते. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे ते काम चोखपणे पार पाडण्यात आले. भारताच्या हवाई दलाने जैश-ए -मोहम्मद, हिजबूल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांची मुख्यालये आणि प्रशिक्षित केंद्रे उद्ध्वस्त केली. भारतीय भूमीतून पाकिस्तानच्या सीमेत कुठेही दडून बसलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करणे भारतासाठी कठीण नाही हा संदेश या निमित्ताने गेला हे महत्त्वाचे आहे. या हल्ल्यानंतर पाकने सुरू केलेला कांगावा पाहता पाकिस्तान हा किती कर्मदरिद्री देश आहे, हे स्पष्ट करण्याची एकही संधी पाकिस्तानी राज्यकर्ते सोडत नाहीत हे पुन्हा एकदा दिसून आले. खरे तर दहशतवाद पोसणारा पाकिस्तान त्याची विषारी फळे चाखत जगभर बदनाम झाला आहे. सध्या तो पूर्णपणे एकाकी पडला आहे.

दहशतवाद्यांनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वेठीस
धरले आहे. जोपर्यंत पाकिस्तान या दहशतवाद्यांच्या मुठीत स्वत:ला सुरक्षित समजत आहे तोपर्यंत त्या देशाला भवितव्य नाही हे ओळखून पाकिस्तानने स्वत:च दहशतवादाविरोधात लढाई सुरू करणे हेच शहाणपणाचे लक्षण ठरेल. पण भारतद्वेषाने आंधळ्या झालेल्या पाकिस्तानकडे तितकी नीतिमत्ताच शिल्लक राहिलेली नाही. भारताचा तिरस्कार करणारा पाकिस्तान आणि तेथील जनता एका वेगळ्याच आभासी जगात वावरत आहेत. २०१९ मध्ये भारताने बालाकोटजवळील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला होता. वास्तविक त्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने धडा घेत भारताच्या हातात हात घालून दहशतवादाविरोधात संघर्ष सुरू केला असता तर ते दोन्ही देशांसाठी हितकारक झाले असते. पाकिस्तानलाही विकासाच्या वाटेवर वाटचाल करता आली असती पण.. कुत्र्याचे शेपूट वाकडेच राहणार हेच पाकने दाखवून दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR