मुंबई : प्रतिनिधी
सध्या रमजान सुरू असून मुस्लिमांसाठी हा महिना खूप महत्त्वाचा असतो. या महिन्यात महाराष्ट्र सरकारने काही विशेष सवलती द्यावात, अशी मागणी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केली आहे.
‘मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे रमजान महिन्यात धार्मिक सवलती देण्याची विनंती केली आहे. रोजा आणि नमाज पठण करणा-यांना दुपारी ४ वाजेपर्यंतच कार्यालयात काम करण्याची आणि त्यानंतर सुटी घेण्याची परवानगी द्यावी’, असे ते म्हणाले. इतर राज्याच्या सरकारने रमजान महिन्यात मुस्लिमांना ही खास सूट दिली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातही याचा विचार करावा, असे अबू आझमींनी फडणवीसांना सांगितले आहे.
याविषयी आझमी पुढे म्हणाले, मुस्लिम समुदायात रमजानचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे आम्हाला ही सूट हवी आहे. तसेच विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे तिथेही काही सूट द्यावी. मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही इतर काही राज्यांची उदाहरणंसुद्धा दिली आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये धार्मिक सवलतीअंतर्गत सरकारी आणि निमसरकारी कर्मचा-यांना रमजान महिन्यात दुपारी ४ वाजल्यानंतर सुटी देण्यात आली आहे. फडणवीसांना मी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्रातही असा निर्णय घ्यावा, जेणेकरून रोजा करणा-यांना थोडा दिलासा मिळेल.

