पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर शनिवारच्या दिवशी भीषण अपघात घडला. फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला आणि बचावाचा प्रयत्न करताना एका तरुणीचा तोल गेल्याने ती सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेनंतर जवळपास नऊ तास चाललेलं धाडसी रेस्क्यू ऑपरेशन पाहून सर्वच थक्क झाले आहेत.
ही घटना राजगड किल्ल्यावरील संजीवनी माची परिसरात घडली. अंजली पाटील (वय २४) ही तरुणी मित्रांसोबत ट्रेकसाठी आली होती. अचानक झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्याने पर्यटकांमध्ये गोंधळ उडाला. त्यात अंजली घाबरली आणि बचावाचा प्रयत्न करत असताना तिचा तोल जाऊन ती ४० फूट खोल दरीत कोसळली. अपघातानंतर तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आणि मणक्याला फ्रॅक्चर झाल्याने ती हालचाल करू शकत नव्हती.
घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिस स्टेशनमार्फत वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळविण्यात आले. दरीत पडलेली तरुणी बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाने अंधारातच धाडसी मोहीम राबवली. रात्रीच्या काळोखात, निसरडा उतार आणि दुर्गम परिसरात काम करणं अत्यंत कठीण होतं. मात्र, पथकातील सदस्यांनी एकजुटीने कार्य करत शेवटी अंजलीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवले.
जवळपास ८ ते ९ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अंजलीला स्ट्रेचरच्या साहाय्याने किल्ल्याच्या पायथ्याशी आणण्यात आले.

