मुंबई : प्रतिनिधी
श्रीलंकेत मोठी जीवितहानी घडवणा-या ‘दितवाह’ चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्यामुळे गारठा देखील वाढला आहे. तसेच, हवामान विभागाने दिलल्या अंदाजानुसार आज विदर्भाततील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. श्रीलंकेतील चक्रीवादळामुळे राज्यातील तापमाणात घट झाली असून थंडी देखील वाढली आहे.
राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होत असतानाच पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे हा गारठा वाढला आहे. उत्तरेकडील थंड वा-यांमुळे महाराष्ट्रात हुडहुडी वाढली असून, अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा एकदा १० अंश सेल्सियसच्या खाली घसरल्याची माहिती मिळत आहे. तसेच, मराठवाड्यातही थंडीचा कडाका वाढला असून, आता पहाटेपासूनच अनेक ठिकाणी धुके दिसू लागले आहे.
मुंबईत देखील थंडीची चाहूल
मुंबई शहर आणि उपनगरातही सकाळी धुके पाहायला मिळाणार आहे. त्यामुळे मुंबईत कमाल तापमान ३२ अंश सेल्सियस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहीणार आहे. कोकणातही हवामान याचप्रमाणे राहणार असून, पश्चिम महाराष्ट्रातही थंडीचा कडाका दिसून येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली असून, आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

