नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील १७ खासदारांना यंदाचा ‘संसदरत्न पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. यंदा ‘संसदरत्न’ पुरस्कारांसाठी महाराष्ट्राने बाजी मारली असून महाराष्ट्रातील ७ खासदारांनी या यादीत स्थान पटकावले आहे. संसदेमध्ये उल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणा-या खासदारांना दरवर्षी ‘प्राईम पॉईंट फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. या संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राने यंदाही बाजी मारली आहे. यात सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह भर्तृहरी महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांना पुरस्कार जाहीर झाला. तसेच अरविंद सावंत, नरेश म्हस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांनाही संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
लोकसभेतील विशेष योगदानाची दखल घेत हा पुरस्कार दिला जातो. १६ व्या लोकसभेनंतर सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल एकूण १७ खासदारांना हा विशेष पुरस्कार देण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे (महाराष्ट्र), शिवसेना नेते श्रीरंगअप्पा बारणे (महाराष्ट्र), भाजपाच्या स्मिता उदय वाघ, शिवसेनेचे नरेश म्हस्के, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, भाजपाच्या मेधा कुलकर्णी, ठाकरे गटाचे अरविंद सावंत या खासदारांचा समावेश आहे. भाजप नेते भर्तृहरी महताब (ओडिशा), क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे नेते एनके प्रेमचंद्रन (केरळ), भाजपाचे प्रवीण पटेल, विद्युत बरन महातो, दिलीप सैकिया यांनाही संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

