मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतक-यांना रात्र-रात्रभर डिझेलसाठी पेट्रोल पंपावर रांगेत बसावे लागत आहे.
वाशिम जिल्ह्यात सलग नवव्या दिवशी डिझेलसाठी शेतक-यांनी रात्रीपासून रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात अकराव्या दिवशीही संकट कायम असून मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत आहे. मे महिन्यात शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे डिझेलची मागणी जवळपास २० ते २५ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र पुरेसा पुरवठा होत नसल्याने अनेक पेट्रोल पंपांवर शेतकरी रात्रंदिवस थांबून डिझेलची वाट पाहत आहेत.
काही ठिकाणी गोंधळ आणि वादाचे प्रकारही समोर आले असून तलवारी आणि कोयते काढल्याच्या घटनांमुळे पेट्रोल पंप कर्मचारीही दहशतीत असल्याचे सांगितले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात याचा मोठा फटका पूर्व हंगामी कापूस लागवडीला बसत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हजारो हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. मात्र यंदा डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टरद्वारे मशागत पूर्ण होऊ शकलेली नाही. अनेक शेतजमिनी अद्याप पडून असून मागील वर्षाच्या तुलनेत लागवड कमी प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यातही आठवडाभरापासून डिझेल टंचाई कायम आहे. बहुतांश पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे बोर्ड लागले असून जिथे डिझेल उपलब्ध आहे, तिथे वाहनांच्या किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. काही शेतकरी अनेक तास वाहनातच बसून आपला नंबर येण्याची वाट पाहताना दिसत आहेत.
बुलडाणा ते चिखली रस्त्यावरील दांडगे यांच्या पेट्रोल पंपावर शेतकरी ट्रॅक्टरसह रात्रभर रांगेत उभे असल्याचे चित्र समोर आले आहे. रात्री पंप बंद असला तरी सकाळी टँकर येईल आणि डिझेल मिळेल, या आशेवर शेतकरी थांबले आहेत. दुसरीकडे जालना जिल्ह्यात ५९ पेट्रोल पंपांवरील इंधन साठा संपला आहे. जालना तालुक्यात सर्वाधिक २४ पंप बंद असल्याने नागरिक आणि शेतक-यांची मोठी गैरसोय होत आहे. कळमनुरी तालुक्यातील आराटी येथील शिवपार्वती पेट्रोल पंपावर डिझेलसाठी लागलेल्या रांगेतून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत काही शेतकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा न्यायालय प्रशासनानेही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इंधन बचतीसाठी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यावर भर देण्यात आला असून अत्यावश्यक कामांशिवाय न्यायालयात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. वकील संघटनांना देखील सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देशहितासाठी इंधनाचा योग्य वापर करण्याचे पत्र न्यायालय प्रशासनाने जारी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीशांच्या सूचनांनंतर हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
रोहित पवार यांचाही सरकारवर निशाणा
इंधन टंचाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात डिझेलसाठी शेतक-यांना १० ते १५ तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. साठेबाजीसाठी शेतकरी डिझेल घेत नाहीत. त्यांच्याकडे एवढा वेळही नाही, असे सांगत त्यांनी पुरवठा साखळीतील त्रुटींवर बोट ठेवले. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिस-यांदा वाढ झाली आहे.
















