मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उकाड्यानंतर हवामानात मोठा बदल झाला असून, १५ जुलै रोजी अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही भागांत जोरदार वा-यांसह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वा-यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे १५ जुलै रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या जम्मू, पाटणा मार्गे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
या सर्व हवामान प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे राज्यातील अनेक भागांत वातावरण ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर कोकणातील काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्या सरींसह उष्णता आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आज ठाणे, रायगड, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस व जोरदार वा-याचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा घाटमाथा, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारी सोलापूर, धाराशिव आणि सातारा जिल्ह्यांत तुलनेने जोरदार पावसाचा अंदाज असून, कोकण व मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता आहे. शुक्रवारी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढू शकतो.
प्रादेशिक अंदाजानुसार पालघर येथे हलक्या पावसाची शक्यता आहे, तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. उत्तर महाराष्ट्रात धुळे व नंदुरबारमध्ये हलक्या सरी, तर नाशिक आणि जळगावमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगरमध्ये यलो अलर्ट लागू आहे.















