मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला आहे. या हवामानाचा फटका शेतक-यांच्या पिकांना बसला आहे.
मंगळवार, २७ जानेवारी रोजी पावसाने अनेक भागांत हजेरी लावली. तर ब-याच ठिकाणी गारांचा पाऊस देखील झाला. हवामान विभागाने राज्यातील ७ जिल्ह्यांना काल यलो अलर्ट जारी केला होता. सायंकाळनंतर धुळे, जळगाव जिल्ह्यांत अनेक भागात पावसाने हजेरी लावली. धुळ्यातील शिरपूरच्या पूर्व भागात १० ते १२ मिनिटे गारपीट झाली. यामुळे थाळनेर, सावेर आदी गावांत मोठी हानी झाली. दरम्यान आज राज्यातील वातावरण ढगाळ स्वरूपाचे आहे. पहाटे अनेक ठिकाणी दाट धुक्यासह मोठ्या प्रमाणात दव पडल्याचे दिसून आले.
तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतक-यावर मोठे संकट ओढवले आहे. शेतक-यांनी या नुकसानाची भरपाई मागण्यासाठी जोर धरला आहे.

