नंदुरबार : प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात लागलेल्या स्थलांतरांचा कलंक पुसण्यासाठी जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे. नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव इतर जिल्ह्यात आणि राज्यात रोजगारासाठी स्थलांतर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. स्थलांतराचे प्रमाण रोखण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली असून जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी ‘मूळवाट’ हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. स्थलांतर, गरीबी आणि रोजगाराच्या कमतरतेमुळे गाव सोडून दूरवर जाणा-या हजारो कुटुंबांच्या समस्या आता स्थानिक पातळीवरच सोडवल्या जाणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला ‘मूळवाट’ हा उपक्रम ग्रामीण सक्षमीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
हंगामी स्थलांतरामुळे अनेकदा महिलांना आणि बालकांना आरोग्य आणि पोषणाच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु जर रोजगार आपल्या गावातच उपलब्ध झाला तर कोणालाही आपलं घर सोडावं लागणार नाही. यासाठी प्रशासनाने पुढील सहा महिन्यांसाठी मनरेगा अंतर्गत नियोजनबद्ध कामांची रूपरेषा तयार केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडे कामाची उपलब्धता निश्चित करण्यात आली असून, कामाच्या अभावामुळे स्थलांतर होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
तरीही स्थलांतर झाल्यास, नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी कार्यालयात मुखादमाचे नाव आणि जिल्ह्याचे नाव नोंदवावे. यामुळे स्थलांतराच्या ठिकाणी अडचण आल्यास प्रशासनाला तत्काळ मदत करता येईल. प्रशासनाने कामाच्या ठिकाणी उद्भवणा-या अडचणींसाठी दोन हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत: मजदूर हेल्पलाईन: १८०० १२० ११२११, महिला व बालक हेल्पलाईन: १८०० ३००० २८२५ या क्रमांकावर संपर्क साधून रोजगार, रेशन, आरोग्य सेवा किंवा अंगणवाडी सेवांशी संबंधित कोणतीही समस्या सोडवली जाणार असे सांगण्यात आले आहे.

