मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची छाटणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ९२ लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी ही संख्या सुमारे ८० लाख आसपास होती.
केवळ तांत्रिक त्रुटीच नव्हे, तर सरकारच्या निकषांमध्ये न बसणा-या लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने यादीतून बाहेर काढण्यात आले आहे. राज्य सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी जवळपास आठ महिन्यांची मुदत दिली होती.
मात्र, वेळेत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे सर्वाधिक म्हणजेच ५० ते ५५ लाख महिला या योजनेतून थेट बाद झाल्या आहेत. योजनेच्या नियमानुसार अडीच लाखांपेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक होते. मात्र, तपासणीत तब्बल १२ लाख महिला या प्राप्तिकर भरणा-या आणि उत्पन्नाची मर्यादा ओलांडणा-या असल्याचे उघड झाल्याने त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले. या योजनेसाठी निर्धारित केलेली ६५ वर्षांची वयोमर्यादा ओलांडलेल्या ४.५ लाखांहून अधिक महिलांनाही वगळण्यात आले आहे.
आधीपासूनच ‘नमो शेतकरी योजने’चा आर्थिक लाभ घेत असलेल्या सुमारे ५ लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेच्या यादीतून कमी करण्यात आले आहे.
’
या छाटणी प्रक्रियेदरम्यान एक अत्यंत रंजक आणि धक्कादायक प्रकार समोर आला. या महिला सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क १४ हजार पुरुषांनी अर्ज करून ‘लाडकी बहीण’ बनण्याचा प्रयत्न केला होता. पडताळणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या सर्व पुरुषांचे अर्ज तत्काळ रद्द करण्यात आले.
राज्याच्या महिला कल्याणावरील खर्चात अवघ्या वर्षभरात झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये हा खर्च केवळ २६१.७८ कोटी रुपये इतका होता. मात्र, २८ जून २०२४ रोजी ‘लाडकी बहीण’ योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर, २०२४-२५ या आर्थिक वर्षात हा खर्च थेट ३३,५१४.३६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याच अफाट वाढीवर कॅगने बोट ठेवले आहे.
‘कॅग’च्या अहवालाने अर्थव्यवस्थेवर ताण
एकीकडे लाभार्थ्यांची छाटणी सुरू असतानाच, शुक्रवारी ‘कॅग’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालाने सरकारची चिंता वाढवली आहे. या योजनेवर होणा-या वारेमाप खर्चामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण येऊ शकतो, असा स्पष्ट इशारा कॅगने दिला आहे. तसेच, योजनेअंतर्गत झालेल्या ३,५४२ कोटी रुपयांच्या खर्चाचे ठोस समर्थन करता येत नसल्याचेही अहवालात नमूद आहे.
बीड जिल्ह्याला छाटणीचा सर्वाधिक फटका
अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत बीड जिल्ह्याचा क्रमांक सर्वात वर आहे. संपूर्ण राज्यातून सर्वाधिक छाटणी याच जिल्ह्यात झाली असून, एकट्या बीडमधून तब्बल २८ लाख महिलांची नावे अपात्र ठरवून यादीतून वगळण्यात आली आहेत.
















