लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरामध्ये दि. ९ ते ३० डिसेंबरदरम्यान आयुष्मान कार्ड निर्मिती करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. लातूर शहर महानगरपालिकेतील आरोग्य केंद्र, सीएससी सेंटर तसेच रास्त भाव दुकान या ठिकाणी केवायसी केली जाणार आहे. तसेच लागलीच आयुष्मान कार्डची निर्मितीदेखील केली जाणार आहे. आरोग्य संरक्षण अधिक प्रभावी व सुकर करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांचे को ब्रँडेड कार्ड निर्माण करणे संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित केले आहेत. त्या अनुषंगाने लातूर शहरात ब्रँडेड आयुष्यमान कार्ड निर्मिती मोहीम राबवली जाणारआहे.
लाभार्थी कोण आहेत? या योजनेचा लाभ लातूर शहरातील सर्व नागरिकांना घेता येतो. यामध्ये प्रामुख्याने प्रतिक कुटुंब प्रति वर्ष रुपये पाच लाखापर्यंत मोफत शस्त्रक्रिया व उपचार हे २३९९ आजारांवरती शहरातील खाजगी व शासकीय, असे एकूण ३६ रुग्णालयामध्ये उपचार घेता येऊ शकतात.
राष्ट्रीय स्तरावरील ओळखपत्र या कार्डमुळे देशभरातील अधिकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेणे लाभार्थ्यांना शक्य होणार आहे. महाराष्ट्रातील सरकारी व मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयांमध्येदेखील याचा लाभ मिळणार आहे.
आरोग्य कवचाचे स्वरूप
दरवर्षी प्रती कुटुंब पाच लाखांपर्यंतचे कॅशलेस आरोग्य कवच या कार्डच्या आधारावर मिळते. यात शस्त्रक्रिया दाखल करून उपचार, आपातकालीन सेवा यांचा समावेश आहे. शासकीय कर्मचा-यांनाही लाभ शहरातील सर्व पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. शासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयदेखील या आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकतात. शहरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आरोग्य विभागामार्फत तसेच सीएससी रास्त भाव दुकानदार यांना आयुष्यमान कार्ड निर्मिती करणे कामी सहकार्य करावे, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी व उपायुक्त श्रीमती वसुधा फड यांनी केले आहे.

