लातूर : प्रतिनिधी
जिल्हयात उन्हाच्या झळा दिवसागणीक वाढू लागल्या आहेत. सोमवारी जिल्हयात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सीअसच्या वर गेल्यामुळे वाढत्या उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. या वाढत्या उन्हाच्या बरोबरच ग्रामीण भगात पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होत चालले आहे. जिल्हयात गेल्या १० दिवसात ८ अधिग्रहणामध्ये वाढ झाली आहे. आज घडीला जिल्हयात ८ गावे, ४ तांडयावर १३ अधिग्रहणाद्वारे व एका टँकर द्वारे १ गाव व १ वाडीला पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्हयात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने यावर्षी पाणी टंचाई जाणवनार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र मार्च महिण्याच्या अखेर पासून जिल्हयात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे ग्रामीण भागातील पाण्याचे स्त्रोत हळू-हळू आटत चालले आहेत. त्यामुळे नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. पाण्याचे स्त्रोत अटत असल्यामुळे नागरीकांच्या बरोबरच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. ग्रामीण भागातून ग्रामपंचायतीकडून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टंचाई निवरणाचे प्रस्ताव पंचायत समितीच्याकडे पाठवले जात आहेत.
जिल्हयातील २५ गावे व १० तांडे, वाडीवर पाणी टंचाई जाणवत असल्याने ग्रामपंचायतींनी पंचायत समित्यांच्याकडे ४१ अधिग्रहणाची मागणी केली आहे. सदर प्रस्तावांची विस्तार अधिका-यांकडून पाहणी करून तहसिलकडे १४ गावे व ७ वाडयांना पाण्याची टंचाई जाणवत असून त्यांना २२अधिग्रहणाची आवश्यकता असल्याचे पंचायत समित्यांनी अहवालाद्वारे कळवले होते. त्यानुसार त्या-त्या तहसिल कार्यालयांनी १२ गावे एक वाडीसाठी १३ अधिग्रहण मंजूर केले आहे.

