पुणे : प्रतिनिधी
डिजिटल युगात तंत्रज्ञानाने कायद्यापेक्षा वेगाने प्रगती केली असून त्याचा मोठा परिणाम तपास यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यावर झाला आहे. मागील दोन दशकांत सायबर गुन्ह्यांची हजारो प्रकरणे थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहेत. अशा परिस्थितीत परदेशी सर्व्हरवरून वेळेत ई-पुरावे मिळवणे, क्रिप्टो व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे, क्यूआर कोड फसवणूक टाळणे आणि न्यायव्यवस्थेत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा योग्य वापर करणे या तातडीच्या गरजा आहेत. त्यामुळे अशी प्रकरणे हाताळण्यासाठी वकिलांनी तंत्रस्नेही होणे आवश्यक असल्याचे मत सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हेरॉल्ड डिकोस्टा यांनी व्यक्त केले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ लॉ’तर्फे आयोजित ‘आधुनिक काळातील कायदेशीर आव्हाने : वकील व कायदेतज्ज्ञांसमोरील शैक्षणिक दृष्टिकोन’ या एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी बीव्हीजी इंडियाचे उपाध्यक्ष अमोल उमराणीकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रोव्होस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, लोकमान्य टिळक लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. केतकी दळवी, डॉ. मोहिनी सूर्यवंशी, स्कूल ऑफ लॉचे प्रा. डॉ. गोविंद राजपाल आदी उपस्थित होते.
मुख्य भाषणात डॉ. डिकोस्टा पुढे म्हणाले, सध्या ई-मेल गैरवापर, क्यूआर कोड व्यवहार फसवणूक, अनधिकृत संकेतस्थळांवरील अवैध विक्री, क्रिप्टो आणि केवायसीशी संबंधित गुन्ह्यांत वाढ झाली आहे. आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी गरजेची आहे. त्यासाठी कायदेशीर साक्षरतेसह वकील, पोलिस आणि विद्यार्थ्यांनी डिजिटल पुरावे मिळवण्याच्या पद्धती आणि सायबर फॉरेन्सिक्सचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.
चर्चासत्राचे दुसरे सत्र ‘सामाजिक बदलांसह घटनात्मक तत्त्वांचे संतुलन’ या विषयावर पार पडले. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे माजी अधिकारी डॉ. नागेश कुमार, अॅड. विभाकर रामतीर्थकर, डॉ. दीप्ती लेले, अॅड. विश्वास खराबे, अॅड. योगेश पवार, अॅड. मंगेश खराबे आदी तज्ज्ञांनी सहभाग घेतला.
कायद्याच्या शिक्षणात तंत्रज्ञान आवश्यक : डॉ. गणकर
डॉ. गणकर पुढे म्हणाल्या, ‘‘कायद्याच्या शिक्षणात तंत्रज्ञान व नैतिकता समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे. त्याचसाठी एमआयटी एडीटी स्कूल ऑफ लॉने बीबीए एलएलबी (इंटीग्रेटेड), एलएलएम, एलएलबी यांसारखे पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच लेबर वेलफेअरमधील डिप्लोमा अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, फॉरेन्सिक आणि एआय टूल्स यांसारखे विषय समाविष्ट केले आहेत. हे अभ्यासक्रम एचआर मॅनेजर्स, आयटी कर्मचारी, डॉक्टर्स तसेच स्वत:चा व्यवसाय करणा-या उद्योजकांना बदलत्या तंत्रज्ञानासोबत चालण्यासाठी उपयुक्त ठरतील.’’ त्यांनी पुढे आवाहन केले की, ‘‘विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन तंत्रज्ञानासोबत चालण्याचा संकल्प करावा.’’
















