पुणे : प्रतिनिधी
राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात वादग्रस्त विधान करून उपस्थितांचे लक्ष वेधले. या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, कृषिमंत्री काय बोललेत? वाकडी कामं पण नंतर सरळ करावी लागतात म्हणे, महायुतीने महाराष्ट्राची तिजोरीच वाकडी केली आहे. वाकडे काम करण्यासाठी तुम्हाला कृषिखाते दिले नाही.
सरळ काम करणा-यांच्या आम्ही पाठीशी आहोत. पण जर तुमच्याकडून वाकडं काही झालं, तर महाराष्ट्र माफ करणार नाही.
महसूल अधिका-यांना मार्गदर्शन करताना भरणे म्हणाले, सरळ काम सगळेच करतात, पण एखादे काम वाकडेकरून परत सरळ करतात, त्याची माणसे नोंद ठेवतात. या वक्तव्यानंतर सभागृहात क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. भरणे यांच्या विधानामुळे सत्ताधा-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
यावेळी त्यांनी पुण्यातून अनेक कंपन्या इतर राज्यात जात असल्याच्या मुद्यावर भाष्य केले. रोहित पवार म्हणाले, तळेगाव, चाकण या परिसरातील कंपन्या इतर राज्यात जात आहेत, दरम्यान, काही नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडीतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रकल्पाचे काम देण्यास स्पष्ट शब्दांत नकार देण्यास सुरुवात केली आहे.

