मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, पुण्यातील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे मुंबई-पुणे महामार्ग व रेल्वेमार्ग बंद पडला आहे. तर पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने विधानसभेत पावसाच्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहवयास मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरत याविषयी चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, यावेळी चर्चेच्या मुद्द्यावरून सभागृहात सत्तधारी-विरोधक आक्रमक झाले. गदारोळ केला जात असल्याने सभागृहाचे कामकाज पाच मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.
राज्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने या गंभीर परिस्थितीवर सभागृहात चर्चा करावी, यासाठी सत्ताधारी मंडळी आक्रमक झाली होती. राज्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पूरपरिस्थितीमुळे राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. त्यांना त्रास होत असल्याचे आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्ट करीत याविषयावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली.
राज्यातील पूरस्थितीची राज्य सरकारला काळजी नाही, असा आरोप यावेळी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केला. तर याविषयावर चर्चा करण्याची मागणी केली जात असताना राज्य सरकार चर्चेला तयार नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केला. यावेळी सभागृहात याच मुद्दयावरून सत्ताधारी व विरोधकानी गदारोळ केला.
यावेळी याच मुद्द्यवरून सत्ताधारी व विरोधकानी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पाच मिनिटासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर उद्या पावसाच्या नुकसानीबाबत चर्चा करू, असे आश्वासन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. त्यानंतर सभागृहातील गदारोळ थांबला.
















