नागपूर/मुंबई : प्रतिनिधी
जगातील तिस-या क्रमांकाची विमानसेवा, असा लौकिक असलेल्या भारतीय विमान उद्योगाचे सध्या मूल्यांकन १६ अब्ज अमेरिकी डॉलर इतके आहे. देशातील विमानतळांच्या संख्येत वाढ होत, हा आकडा आता ४८७ इतका झाला आहे, तर आजघडीला देशात एकूण ८०० विमाने आहेत. गेल्या दोन वर्षांत दहा कोटी लोकांंनी विमान प्रवास केला आहे. प्रत्येक महिन्यागणिक विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, गुरुवारच्या अपघाताचा फटका विमान उद्योगाला बसू शकतो.
११ अब्जाचा परतावा : गुरुवारच्या विमान अपघातानंतर संबंधित विमानाला विमा देणा-या कंपनीला ११ अब्ज रुपयांपर्यंतचा परतावा द्यावा लागेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. यापैकी ८ अब्ज रुपये, हे प्रत्यक्ष विमानाची भरपाई म्हणून, तर उर्वरित ३ अब्ज रुपये अन्य विविध कारणांसाठी द्यावे लागणार आहेत.
तांत्रिक दोषात वाढ : तंत्रज्ञान व एआयच्या माध्यमातून असे बिघाड कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०२२ पासून देशात ‘एअर इंडिया’च्या विमानांतील ‘फॉल्ट्स’ वाढल्याचे दिसून आले आहे. विमान बिघाडासंदर्भात प्राप्त अधिकृत आकडेवारीनुसार २०२२ ते २०२४ या कालावधित देशभरात विविध कंपन्यांच्या विमानांमध्ये १ हजार ४२६ ‘फॉल्ट्स’ समोर आले. यात ‘एअर इंडिया’ व ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ या कंपन्यांच्या विमानांत ३१३ फॉल्ट्स आढळले. यात ‘एअर इंडिया’तील २२० व ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’मधील ९३ फॉल्ट्सचा समावेश होता.