लातूर : प्रतिनिधी
मनासारखा राजा आणि राजासारखं मन, ही बिरुदावली लातूरकरांनीच विलासराव देशमुखसाहेबांना दिलेली आहे आणि साहेबांनीही लातूरकरांवर अपार प्रेम केले. लातूरकर आणि देशमुख कुटूंबियाचे नाते वेगळे आहे. त्यामुळे साहेबांबद्दल कोणी काय बोलले याने काहींच फरक पडणार नाही. कारण साहेब लातूरकरांच्या -हदयात आहेत, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील काँग्रेस-वंचित बहूजन विकास आघाडीचे उमेदवार कांचन अजनीकर, सुकेशनी मुस्कावाड, दीपक सुळ आणि बालाजी सोळुंके यांच्या प्रचारार्थ आयोजित महिलांच्या संवाद बैठकीत चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी अॅड. जयश्रीताई पाटील, संगीताताई मोळवणे, डॉ. ज्योतीताई सूळ, संगीताताई सूळ यांच्यासह कांचन अजनीकर, सुकेशनी मुस्कावाड, दीपक सूळ व बालाजी सोळूंके यांची उपस्थिती होती.
आताची सत्ताधारी मंडळी श्री विलासराव देशमुख साहेबांच्या कार्याचे दाखले देतात आणि त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्याने साहेबांबद्दल निषेधार्य वक्तव्य केले. या वक्तव्याचा सर्वस्तरातून निषेध होत आहे, असे नमुद करुन चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख पुढे म्हणाल्या, अमित एकटे नाहीत, लातूरची जनता त्यांच्यासोबत आहे. संविधानानूसार दर पाच वर्षाला निवडणुका होणे अपेक्षीत असताना भाजपाच्या सत्ताधा-यांनी तब्बल आठ वर्षे निवडणुका होऊ दिल्या नाहीत, असे नमुद करुन चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख म्हणाल्या, लातूर शहर महानगरपालिकेत गेली तीन वर्षे प्रशासक आहे. हे प्रशासक सरकारनेच बसवलेले आहे. त्यामुळे प्रशासक म्हणजेच सरकारने प्रशासकाच्या काळात लातूरसाठी काय केले. याचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे. काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीने लातूरच्या विकासाचा जाहिरनामा तयार केला आहे. तो सर्व लातूरकरांना मिळेलच. जी माणसं तुमच्या कामाला येतात त्यांनाच मतदान करा. काँग्रेस हाता पंजा आणि वंचितच्या गॅस सिलेंडर या चिन्हावरच मतदान करा. विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका. काँग्रेस-वंचित आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करुन विजयी करा, असे आवाहनही चेअरमन श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी केले.
यावेळी अॅड. जयश्रीताई पाटील, संगीताताई मोळवणे, डॉ. ज्योतीताई सूळ, दीपक सूळ, सुकेशनी मुस्कावाड, कांचन अजनीकर, बालाजी सोळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचाली माजी नगरसेविका डॉ. रुपाली सोळूंके यांनी केले. या वेळी सुनीता हाके, मीना हाके, अरुणा गलांडे, सुलोचना सूळ, उमा पांचाळ, विश्रांती माने यांच्यासह प्रभाग क्रमांक १० मधील महिला उपस्थित होत्या.

