मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेतून निलंबित झाल्यानंतर चर्चेत असलेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज १४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
खेडेकर यांच्या प्रवेशाचा मुहूर्त तब्बल तीन वेळा पुढे ढकलण्यात आला होता. दरवेळी पक्षप्रवेशाच्या चर्चा झडत असतानाच कोणती ना कोणती अडचण समोर येत होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. मात्र आज झालेल्या पक्षप्रवेशाने त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
वैभव खेडेकर हे मनसेचे जुने आणि कोकणातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशीही त्यांची प्रतिमा होती. मात्र, अलीकडच्या काळात त्यांची भाजप व शिंदे गटाशी जवळीक वाढली होती. भाजपमध्ये जाण्याची तयारी करताच मनसेने तत्काळ त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर खेडेकर यांनी भाजप प्रवेश निश्चित केला असला तरी त्यात विलंब होऊ लागला. त्यामुळे राजकीय वर्तुळात ‘भाजपने त्यांना झुलवतंय का?’ असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता.
भाजप प्रवेश रखडल्याने खेडेकर स्वत: मुंबईत येऊन भाजप नेत्यांची भेट घेऊ लागले होते. रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. पक्षप्रवेश कधी होणार, यावर प्रश्नचिन्ह कायम असतानाच आज अचानक त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडला आहे. खेडेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश हे केवळ वैयक्तिक राजकीय पुनरागमन नसून, कोकणात भाजपची घडी अधिक मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग असल्याचे विश्लेषण होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने या प्रवेशाला महत्त्व दिलं जात आहे.
उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला मोठा धक्का
दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राज्य संघटक अॅड. ललिता शाम पाटील आणि अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पराग पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटाला सोड चिठ्ठी दिली आहे. त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
















