कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. कोल्हापुरात आज (९ जून) शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते सतेज पाटील करत आहेत.
शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी या आंदोलनामागील भूमिका स्पष्ट करताना गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, हा प्रकल्प विकासाच्या नावाखाली राबवला जात असला तरी प्रत्यक्षात इंडस्ट्रियल कॉरिडॉर उभारणीसाठी शेतक-यांच्या सुपीक जमिनी कवडीमोल भावात हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा डाव उधळून लावण्यासाठीच कोल्हापुरातील शेतकरी एकवटत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राज्य सरकारच्या मते, शक्तिपीठ महामार्गामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांना जोडणारा वेगवान दळणवळण मार्ग तयार होणार आहे. औद्योगिक गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा सरकारचा दावा आहे. मात्र विरोधक आणि शेतकरी संघटनांचे म्हणणे यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्यांच्या मते, प्रकल्पामुळे हजारो एकर सुपीक जमीन बाधित होणार असून अनेक शेतकरी कुटुंबांचे विस्थापन होऊ शकते.
या आंदोलनामुळे शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा आता केवळ शेतकरी आंदोलनापुरता मर्यादित राहिलेला नाही. काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विविध स्थानिक संघटना या मुद्यावर एकत्र आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात हा विषय राज्याच्या राजकारणातही महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत.
७८ गावांचा वाढता विरोध
शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गातील अनेक गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तीव्र नाराजी आहे. विशेषत: कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. यापूर्वी ७८ गावांतील शेतक-यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. आजच्या आंदोलनातही या गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.
सर्वेक्षणावरूनही वाद
महामार्गाच्या सर्वेक्षण प्रक्रियेवरूनही वाद निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये मोजणीसाठी गेलेल्या पथकांना ग्रामस्थांच्या विरोधाचा सामना करावा लागला. तर काही ठिकाणी पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण करण्यात आल्याने शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. माळशिरससह काही भागांत मोजणीपूर्वी शेतक-यांना ताब्यात घेतल्याच्या घटनांमुळे आंदोलनाला अधिक धार मिळाली आहे.
















