26.7 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रसत्तेचा मलिदा खाताना एकत्र येतात

सत्तेचा मलिदा खाताना एकत्र येतात

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची सत्ताधा-यांवर टीका

मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांवर जोरदार शब्दांत टीका केली आहे. सत्तेसाठी सत्ताधारी नेत्यांची भूमिका दुटप्पी असून, सत्तेचा लाभ घ्यायचा असेल तेव्हा हे नेते एकत्र येतात आणि सत्ता हातातून गेल्यावर पुन्हा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत ‘कपडे उतरवण्याचे’ राजकारण सुरू करतात, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले की, सध्या राज्यातील राजकारणात तत्त्वांना, विचारांना किंवा जनतेच्या प्रश्नांना कोणतेही स्थान उरलेले नाही. सत्तेचा मलिदा खाण्यासाठी वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात आणि सत्तेच्या खुर्चीसाठी कोणाशीही तडजोड करण्यास तयार असतात. मात्र सत्ता डळमळीत झाली किंवा सत्तेबाहेर जावे लागले, की हेच नेते एकमेकांवर गंभीर आरोप करतात, जुने वाद बाहेर काढतात आणि जनतेसमोर तमाशा उभा करतात, अशी टीका त्यांनी केली.

सत्तेसाठी हे लोक पुन्हा एकमेकांचे कपडे उतरवण्याचे काम करतात. कालपर्यंत जे एकमेकांची पाठराखण करत होते, तेच आज एकमेकांवर भ्रष्टाचाराचे, अनैतिकतेचे आरोप करत आहेत. हे सगळं पाहून जनतेचा राजकारणावरचा विश्वास उडत चालला आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. त्यांनी सत्ताधा-यांच्या या भूमिकेला ‘सत्ताकेंद्रित राजकारण’ असे संबोधले.

काँग्रेस पक्षाबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, आम्ही विरोधात असलो तरी आमची भूमिका स्पष्ट आहे. ‘आम्ही कपडे सांभाळतोय,’ असे सांगत त्यांनी काँग्रेस पक्ष सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणार नाही, असा दावा केला. काँग्रेसने नेहमीच संविधान, लोकशाही मूल्ये आणि जनतेच्या हिताला प्राधान्य दिले असून, सत्ता मिळवण्यासाठी तत्त्वांशी तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे जनतेचे प्रश्न बाजूला पडले असून, बेरोजगारी, महागाई, शेतक-यांचे प्रश्न आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न दुर्लक्षित होत असल्याची खंतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. सत्ताधारी पक्ष एकमेकांशी सत्तेचे गणित जुळवण्यात गुंतले असताना सामान्य नागरिक मात्र अडचणीत सापडला आहे, असे ते म्हणाले. शेवटी त्यांनी सत्ताधा-यांना इशारा देत सांगितले की, जनतेला सगळं दिसत आहे आणि योग्य वेळी जनता या सत्ताकेंद्रित राजकारणाला उत्तर देईल. काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील, असा निर्धारही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR