मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थवरील पुण्यातील जमीन घोटाळ्याचे आरोप ताजे असतानाच, आता काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. सनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये २०० कोटींची जागा ३ कोटींमध्ये लाटल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते चंद्रपूर येथे पत्रकारांसोबत बोलत होते.
माझ्याकडे एक प्रकरण आले आहे. यासंदर्भात मी उद्या सविस्तर माहिती देणार आहे. सर्व्हेनंबरसह माहिती देतो. आपण यातही लक्ष घालावे. या राज्यात घोटाळ्यांची मोठी मालिका सुरू झाली आहे. मंत्री सरनाईक यांनी स्वत:च्या शैक्षनिक संस्थेला मीरा भाईंदरमधील ४ एकर प्राईम लँड, जिची किंमत बाजारमूल्याप्रमाणे २०० कोटी रुपये आहे, ती ३ कोटी रुपयांमध्ये घेतली आहे. मंत्र्यांना अशी जागा स्वत:च्या चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येते का? आणि जर हे होऊ शकते, तर महाराष्ट्र लुटून खा. आम्ही डोळे बंद करून बसतो. लुटा…! असे म्हणायची वेळ आता आली आहे.
तक्रार दिली, तर…!
दरम्यान भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी, विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर भाष्य केले आहे. बावनकुळे म्हणाले, वडेट्टीवार कोणत्या प्रकरणासंदर्भात बोलत आहेत, जर त्यांनी मला काही तक्रार दिली, तर…, हे लोक केवळ माध्यमांमध्ये बोलतात. प्रश्न असा आहे की, तक्रार द्यायला हवी ना. तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल. तसेही, परवाच्या घटनेवर (पार्थ पवार) कुणाची तक्रार नाही. पण आम्हाला ते प्रकरण समजल्यावर आम्ही कारवाई केली. त्यावर आम्ही चौकशी नेमली. आम्हाला ते आढळलं. आम्ही कारवाई केली.
उत्तर देणे गरजेचे : सरनाईकांची पहिली प्रतिक्रिया
शिवसेना शिंदे गटाचे नेते, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यानंतर याबाबत आता सरनाईकांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मी आज सकाळी लवकर आलो हे पाहण्यासाठी की मी २०० कोटींची जमीन ३ कोटींत घेतली आणि मलाच माहीत नाही. मी सुद्धा खुश झालो की, इतक्या स्वस्तात जमीन मला मिळाली असेल तर त्याची पाहणी करणे गरजेचे आहे. पण ठीक आहे. हा विषय जरी वेगळा असेल तरी शेवटी मी राज्याचा मंत्री आहे. अशा प्रकारचे गंभीर आरोप जर माझ्यावर होत असतील तर त्याचे उत्तर जनतेला देणे, माझे काम आहे आणि ते माझे कर्तव्य समजतो. परंतु, सद्यपरिस्थितीत तरी मला माझी अशी कोणतीही जमीन असल्याचे लक्षात नसल्याचे सरनाईक यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

