नाशिक : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नाशिक यांचे राजकीय ऋणानुबंध होते. अनेक नेत्यांचा उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी थेट संपर्क होता. त्यामुळे आजच्या दुर्घटनेने जिल्ह्यातील सर्वच आमदार सुन्न झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार आहेत. बारामती धावपट्टीवर विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने उपमुख्यमंत्री पवार यांचे निधन झाले. या वृत्ताने जिल्ह्यातील सर्वच आमदार सुन्न झाले आहेत.
देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी या वृत्ताने आपल्याला धक्का बसला आहे, असे सांगितले. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भगूर येथे उपमुख्यमंत्र्यांची सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी आमदार अहिरे यांचे कौतुक केले होते.
यासंदर्भात आमदार अहिरे प्रतिक्रिया व्यक्त करताना नि:शब्द झाल्या. त्या अक्षरश: ओक्साबोक्सी रडल्या. त्यांना शब्दही फुटत नव्हता. यावेळी पक्षाचे विक्रम कोठुळे, जगदीश पवार व अन्य पदाधिका-यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत उमेदवार असल्याने त्यांच्याशी मुख्यमंत्री पवार यांनी संवाद साधला होता. त्या म्हणाल्या, सामान्य आमदाराला त्यांनी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला. माझ्या पाठीशी उभे राहिले. अडचणीच्या काळात नेहमीच ते मदतीला येत असत. त्यांच्या निधनाने आम्हाला पोरके झाल्यासारखे वाटते आहे.

