लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयाला मार्च पासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हयात टँकरची व अधिग्रहणाची संख्या वाढत असताना मे महिण्याच्या अखेरीस भूजल पातळीत ०.६२ मिटरने वाढ झाल्याचे वरिष्ठ भूजल विभागाच्या तपासणी अहवालात समोर आले आहे. विशेष म्हणजे सलग दुस-या वर्षी मे महिण्यात भूजल पातळीत ०.६२ मिटरने वाढ झाली आहे.
लातूर जिल्हयात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला होता. तरीही वाढत्या उन्हामुळे तापमानात वाढ होऊन नद्या, ओढे कोरडे पडल्याने सार्वजनीक पाणी पुरवठयाचे स्त्रोत टप्या-टप्याने कोरडे पडत आहेत. त्यामुळे जिल्हयात मार्च महिण्यापासून पाणी टंचाई जानऊ लागली. ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आसून गावे, वाडयांना ११३ अधिग्रहण व ३ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गेल्यावर्षी मे महिण्यात अवकाळी पाऊस पडल्याने भूजल पातळी वाढली होती. यावर्षी मे मध्ये आवकाळी पाऊस न होताच गेल्या पाच वर्षाचया तुलनेत भूजल पातळी वाढली आहे. असे आसताना उलट आज घडीला ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
लातूर जिल्हयातील १०९ जुन्या शिवकालीन विहिरींचे वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाच्या टिमकडून जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर महिण्यात भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात येते. त्यानुसार मे अखेर जिल्हयात मान्सून पूर्व भूजल पातळीची तपासणी लातूरच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांच्या टिमनी केली असता जिल्हयाच्या भूजल पातळीत गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत ०.६२ मिटरने वाढ झाल्याचे निदर्शनास आले
आहे.
औसा तालुक्याची १.१० मिटरने भूजल पातळी वाढली
शिवकालीन विहिरींची भूजल विभागाने मान्सूनपूर्व तपासणी केली असता मे मध्ये गेल्या पाच वर्षाच्या तलुनेत लातूर जिल्हयाच्या भूजल पातळीत सलग दुस-या वर्षी भूजल पातळीत वाढ झाली असून यावर्षी ०.६२ मिटरने वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यात सर्वाधिक औसा तालुक्याची १.१० मिटरने भूजल पातळी वाढ झाली आहे. देवणी तालुक्याची ०.८३ मिटर, निलंगा तालुक्याची ०.७९ मिटर, शिरूर अनंतपाळ व जळकोट तालुक्याची ०.७६ मिटर, उदगीर तालुक्याची ०.५८ मिटर, अहमदपूर तालुक्याची ०.३७ मिटर, चाकूर तालुक्याची ०.३४ मिटर, रेणापूर तालुक्याची ०.३३ मिटर, तर सर्वात कमी लातूर तालुक्याची ०.३१ मिटरने भूजल पातळीत वाढ झाली आहे.
मार्च महिन्यात घटलेली भूजल पातळी मेमध्ये वाढली
लातूर जिल्ह्यातील १०९ निरीक्षण विहिरींच्या भूजलाची वरीष्ठ भूजल विभागाने मार्च मध्ये तपासणी केली असता गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत चाकूर तालुक्याची ०.२५, निलंगा तालुक्याची ०.०३, शिरूर अनंतपाळ तालुक्याची ०.०४ मिटरने घट झाली होती. तर याच तालुक्यांची मे महिण्यात कसलाही पाऊस न पडता पाच वर्षाच्या सरासरीमुळे भूजल पातळी अनुक्रमे ०.३४, ०.७९ व ०.७६ मिटरने वाढ झाल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे ज्या तालुक्यांची भूजल पातळी वाढली त्या तालुक्यात अधिग्रणांचा मोठया प्रमाणात धडाका सुरू आहे.
















