अहिल्यानगर : प्रतिनिधी
शिर्डीच्या साईबाबा दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी लाडूचा प्रसाद उपलब्ध केला जातो. साईबाबांच्या बुंदी लाडू प्रसादाच्या दरात साई संस्थान कडून ५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी २० रुपयांना मिळणारे दोन लाडूचे पाकिट आता ३० रुपयांना मिळणार आहेत. या दरवाढीमुळे साईभक्तांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. दरम्यान साई संस्थांनच्या या निर्णयामुळे भक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे.
शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. याठिकाणी येणार भाविक साईबाबांचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू घरी घेऊन जात असतात. तर संस्थांकडून भाविकांना मोफत प्रसाद देखील दिला जात असतो. तसेच बुंदीच्या लाडूचा प्रसाद विक्रीसाठी उपलब्ध असतो. हा प्रसाद भाविकांना २० रुपयांना दोन लाडूंचे पाकीट या दराने दिले जात होते. मात्र आता याच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
भाविकांमध्ये नाराजी
साई संस्थानने लाडू प्रसादात ५० टक्के म्हणजे एका पाकिटामागे दहा रुपयांनी वाढ केली आहे. अर्थात साई दर्शनानंतर भाविकांना मोफत वाटल्या जाणा-या बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्याच्या हेतूने साई संस्थानने ही दरवाढ केल्याचं बोललं जात आहे. मात्र भाविकांच्या देणग्यांवर चालणा-या विश्वस्त संस्थेने असा ‘व्यावसायिक’ दृष्टिकोन ठेवून असा तोटा भरून काढावा का? प्रश्न भाविक करत आहेत.
विशेष म्हणजे गोरगरिबांना परवडणारे १० रुपयांचे एक लाडूचे पाकीट आणि मध्यमवर्गीयांना सोयीचे २५ रुपयांचे तीन लाडूचे पाकीट बंद करून संस्थानने केवळ एकच ‘प्रीमियम’ पर्याय ठेवला आहे. एकीकडे मोफत भोजनाचा आणि माफक दरातील चहा, कॉफी, दूध, नाश्त्याचा कौतुकास्पद उपक्रम, तर दुसरीकडे प्रसादातून हिशोब जुळविण्याची कसरत, हे गणित काही भाविकांना कळेनासे झाले आहे. खरंतर साई समाधीच्या दर्शनानंतर भाविक मोठ्या श्रद्धेने हा लाडू प्रसाद घरी घेऊन जातात. बाबांच्या दर्शनानंतर प्रसादाची गोडी आता भाविकांच्या खिशाला परवडणार का? हाच खरा प्रश्न आहे.
















