लातूर : प्रतिनिधी
मोठे यश साध्य करण्यासाठी कोणत्याच पदाची गरज नाही, हे अॅड. किशनराव सावरीकर ऊर्फ भाऊ यांच्या कार्यातून आपणाला दिसून येते. या काळात या नेत्यांवर महात्मा गांधी, पंडित नेहरू, स्वामी रामानंद तिर्थ आदींच्या कार्याचा प्रभाव होता. महात्मा गांधी यांनी सांगीतले होते की, खेडयाकडे चला, खेडयाचा विकास म्हणजे देशाचा विकास, हीच संकल्पना आजही कायम आहे. त्या काळात राजकारण हे साध्य नव्हते, साधन होते. या विचारातून अॅड. किशनराव सावरीकर ऊर्फ भाऊ यांनी आपले गाव, जिल्हयात नवा विचार घेऊन विकासाचे कार्य केले. तेच विचार नव्या तरूण पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री सहकार महर्षि दिलीपराव देशमुख यांनी केले.
महात्मा गांधी ग्रामविकास सेवा केंद्र सावरी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा धाराशिव व लातूर जिल्हयातील राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी कलेले अॅड. किशनराव गणपतराव सावरीकर ऊर्फ भाऊ यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त जीवनकार्याचा वेध घेणा-या तेरणेचा कर्मयोगी गौरव ग्रंथाचा तथा माहितीपटाचा प्रकाशन सोहळा माजी मंत्री सहकार महर्षि दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. गोपाळराव पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, रविंद्र गायकवाड, शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्राचार्य अनिरूध्द जाधव, अशोकराव पाटील निलंगेकर, पी. आर. देशमुख, व्यंकटराव गायकवाड, अजय सावरीकर, संजय सावरीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. छोटयाशा गावात राहून, कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता अॅड. किशनराव सावरीकरांनी कार्य केले. त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळे शिक्षणासाठी ते कार्य केल्याचे सांगून दिलीपराव देशमुख म्हणाले की, सावरीकरांचे माणसे जोडणे व ते टिकवणे हा गुण त्यांच्या पुढच्या पिढीतून मुलांमध्ये दिसून येत आहे. आज ते पुस्तक प्रकाशन झाले, या सुंदर ग्रंथातून सावरीकर समजून घ्यावेत, असे ते म्हणाले. यावेळी कव्हेकर म्हणाले की, अॅड. किशनराव सावरीकरांनी मराठवाडयातील पहिला बंधारा बांधून शेतक-यांसाठी कार्य केले. आम्हाला त्यांच्याकडून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली.
तसेच व्यंकटराव गायकवाड म्हणाले की, समाजाला मदत करण्यासाठी अॅड. किशनराव सावरीकरांनी जोमाने काम केले. तेरणा व मांजरा काठावर लोकनेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना अनेक केटीवेअर उभा केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आजय सावरीकर म्हणाले की, वडिलांनी वकीली सोडून समाज सेवा केली. त्यांनी सहकार, शिक्षण, कृषि, जलसिंचन आदी क्षेत्रात कार्य केले. त्यांच्या कार्याचा जीवनपट पुस्तक व माहितीपटातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी कार्यक्रमास किशोर गोरके, शिवाजी जाधव, शहाजी कांबळे, विजयकुमार सोनवणे, गोपीनाथ तेरकर, भाऊराव काळे, गणपतराव सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

