मुंबई : प्रतिनिधी
देशातील प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीतील जंतरमंतरवर २८ जूनपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाची विरोधकांकडून दखल घेण्यात येत आहे. विरोधकांकडून या मुद्यावरून सरकारला घेरण्यात येत आहे. तर काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांगचुक यांना आपला पाठिंबा जाहीर केला. ज्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची दखल घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
कॉक्रोच जनता पार्टी या संघटनेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात ते सहभागी झाले असून,‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी करण्यात येत आहे. त्यांच्या या आमरण उपोषणाचा आज गुरुवारी (१६ जुलै) १९ वा दिवस आहे. याच मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्याशिवाय, त्यांनी वांगचुक यांच्या खालावत जाणा-या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरेंनी सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टच्या माध्यमातून भाजपवर जोरदार हल्लाबोलही केला आहे.‘सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचे एक बरे असते की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो’ असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. तर, ‘निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचे द्योतक म्हणून दाखवायचे आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे’ असेही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्यं खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतं की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे.
हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ? ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वत:च्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधा-यांच्या पक्षातील स्वकीय आणि विरोधकांना कसे बदनाम करता येईल यात व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे.
भाजपला अमर्याद सत्तेचा माज आला असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी लिहिले आहे की, सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. सोनम वांगचुक यांना २०१८ साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केले नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात. आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्यांची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत असेही राज ठाकरे म्हणाले.
















