ठाणे : प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा इथल्य एआयएमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या वादग्रस्त विधानानंतर एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुंब्राच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू, असे विधान केले.
हिरवा रंग हा दहशतवादाचा आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इम्तियाज जलील यांच्या या विधानावर भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांना अंगावर घेतले आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत एआयएमआयएमकडून उमेदवारी मिळालेल्या सहर शेख या विजयी झाल्यानंतर ‘मुंब्रा हिरवा करायचा आहे’ या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या होत्या. या विधानावरील वादानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी मुंब्रा येथे सहर शेख आणि अन्य नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतली.
या वेळी जलील यांनी सहर शेख यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे, असे सांगत त्यांनी नाव न घेता भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. कारवाई करायची असेल, तर ती माझ्यावर करा, असा थेट इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, जलील यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
दरम्यान, सहर शेख यांनी पोलिसांना दिलेल्या कथित स्पष्टीकरणावरून जलील यांना विचारले असता, त्यांनी ठाम भूमिका मांडली. हिरवा हा शब्द दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. झाडे, पर्यावरण आणि विकासाच्या संदर्भातही हिरवा शब्द वापरला जातो, मग या विधानाकडे त्या दृष्टीने का पाहिले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नगरसेविका सहर शेख यांच्यावर माफी मागण्यासाठी दबाव आणल्याचा दावाही त्यांनी केला.
धार्मिक विद्रोह सहन करणार नाही
भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हिरवा करणार म्हणजे पाकिस्तानचे झेंडे फडकवणे का? कुण्या रंगाबद्दल कुणालाही आक्षेप घेण्याची गरज नाही. रंगाबद्दल आम्हाला आक्षेप नाही. मात्र त्यामागची भूमिका काय? इम्तियाज जलील जर वेगळ्या मार्गाने काही म्हणत असतील, तर ते बरोबर नाही. झेंड्याबद्दल, रंगाबद्दल कुणाचाही आक्षेप राहू शकत नाही. पण तुम्ही त्यातून जर धार्मिक, सामाजिक विद्रोह निर्माण करत असाल, तर महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
पंधरा सेकंद देखील आम्हाला पुरेसे…
इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहेत, असा घणाघात माजी खासदार नवनीत राणा यांनी केला. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत, त्यांच्या विचारांचे रक्त आजही आमच्यात आहे. तुम्ही नाही, तर तुमच्या सात पिढ्या जरी, वरून खाली आल्या तरी, महाराष्ट्राला हिरवा नाही करू शकत. इम्तियाज जलील तमीज विसरलेले आहेत. अल्पसंख्याक म्हणून आम्ही तुम्हाला खपवून घेत आहोत, याचा अर्थ असा नाही की आम्ही बांगड्या घालून बसलो आहोत. ज्या दिवशी दाखवण्याची वेळ आली त्या दिवशी पंधरा सेकंद देखील आम्हाला पुरेसे आहेत. महाराष्ट्र हिरवा करणं हे स्वप्नातही पूर्ण होणार नाही, असे नवनीत राणा यांनी म्हटले.

