पुणे : प्रतिनिधी
भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन ‘किसान’ येत्या दि १० ते १४ डिसेंबर दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन मोशी येथे आयोजित करण्यात आले आहे. सुमारे ३० एकरावर किसान प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील.
प्रदर्शनाच्या कालावधीत देशभरातून दोन लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतक-यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती,पाणी नियोजन,कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री,पशुधन,जैव,ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत.प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ उद्योगातील कंपन्यांचे स्टॉल शेतक-यांना पाहायला मिळतील.शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत आयोजित केले आहे.
प्रत्यक्ष प्रदर्शनातील सहभागा सोबतच प्रदर्शक कंपन्या किसान डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील त्यांच्या उत्पादनांची यादी प्रसिद्ध करू शकतात. या माध्यमातून प्रदर्शकांची माहिती देशाच्या कानाकोप-यातील १० लाख शेतक-यांपर्यंत पाहोचवण्याचे योजले आहे. या शेतक-यांना अधिक माहितीसाठी कंपन्यांशी संवाद साधणे शक्य होईल.
मातीच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम योजला आहे.आपली माती जिवंत आहे का? याविषयी विचार करायला उद्युक्त करणे व मातीच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.हा उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान आणि इतर संबंधित विभागांच्या सहकार्याने संयुक्तपणे राबविण्यात येत आहे.मधमाशा शेतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रभावी परागीकरणासाठी मधमाश्यांची संख्या वाढणे अत्यावश्यक आहे. ‘बसवंत हनीबी पार्क अँड ट्रेनिंग सेंटर’ यांच्या सहकार्याने परागीकरणाचे महत्व आणि आणि मधमाशांना अनुकूल अशा शेती पद्धतींची माहिती शेतक-यांना दिली जाते.

