मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी. १५ जानेवारी रोजी मुंबई, ठाण्यासह २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने ‘भरपगारी सुटी’ जाहीर केली आहे. खासगी कंपन्या, आयटी पार्क्स आणि मॉलमधील कर्मचा-यांनाही हा नियम लागू असेल. मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सुटी न देणा-या आस्थापनांवर कडक कारवाईचा इशारा उद्योग आणि कामगार विभागाने दिला आहे.
मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. १५ जानेवारी रोजी २९ महापालिकांसाठी मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या ठिकाणी राज्यात भरपगारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय ज्या ठिकाणी मतदान आहे, त्या ठिकाणी शाळांनाही सुटी जाहीर करण्यात येणार आहे.

