लातूर : प्रतिनिधी
वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ईमेल’ व ‘एसएमएस’ चा पर्याय निवडणा-या लातूर परिमंडलातील २३ हजार ५६६ लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा लाभ घेतला आहे. या वीजग्राहकांना २८ लाख २७ हजार रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी होण्याची ऑनलाइन सुविधा व योजनेची सविस्तर माहिती महावितरणच्या मोबाईल ऍप व ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभागी व्हावे व पर्यावरणपूरक योजनेत योगदान द्यावे असे आवाहन महावितरणच्या लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले आहे.
वार्षिक १२० रूपयांचा फायदा – महावितरणकडून पर्यावरणपूरक ‘गो-ग्रीन’ योजनेतून वीज बिलासाठी छापील कागदाचा वापर कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. कागदी बिलाऐवजी फक्त ‘ईमेल’ व ‘एसएमएस’ चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा वीजबिलामध्ये वार्षिक १२० रुपयांचा आर्थिक फायदा होत आहे. विशेष म्हणजे गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे. पूर्वी ही सवलत प्रत्येकी १० रुपये प्रत्येक बिलामध्ये मिळत होती. वीजग्राहकांसाठी ऐच्छिक असलेल्या गो-ग्रीन योजनेला परिमंडलात प्रतिसाद वाढत आहे. या योजनेत आतापर्यंत २३ हजार ५६६ पर्यावरणस्रेही वीजग्राहक सहभागी झाले आहेत.
या मध्ये लातूर मंडळातील लातूर विभागातील ५ हजार ७९१ वीजग्राहक, उदगीर विभागातील २ हजार ८०७ वीजग्राहक तर निलंगा विभागातील १ हजार ६८६ वीजग्राहक सहभागी झाले आहेत. तसेच धाराशिव मंडळातील धाराशिव विभागातील ३ हजार ४८८, तूळजापूर विभागातील १ हजार ८०८ वीजग्राहक त्याचबरोबर बीड मंडळातील बीड विभागातील ४ हजार १३४ तर अंबाजोगाई विभागातील ३ हजार ८५२ वीजग्राहक सहभागी झाले आहेत. या सर्व सहभागी ग्राहकांना वार्षीक १२० रूपयांची सुट वीजबिलात मिळत आहे.

