लातूर : प्रतिनिधी
थकीत कर्जदार शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही योजना जाहीर केली आहे. लातूर जिल्ह्यात या योजनेची प्रभावी आणि गतीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून पात्र कर्जदार शेतक-यांची माहिती सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही संबंधित बँकांमार्फत सुरु आहे. या अंतर्गत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ४४ हजार ६९९ कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतक-यांना २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा थेट लाभ दिला जाणार आहे. यापूर्वीच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे लाभार्थी असलेल्या पात्र शेतक-यांसाठीही शासनाने यात विशेष व स्वतंत्र तरतूद केली आहे. तसेच ज्या शेतक-यांची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी ‘वन टाईम सेटलमेंट’ म्हणजेच एकवेळ समझोता योजना लागू करण्यात आली आहे. यात शेतक-यांनी आपल्या हिश्शाची रक्कम भरल्यानंतर, राज्य शासन कर्जमुक्ती रक्कम थेट शेतक-यांच्या कर्ज खात्यात जमा करणार आहे. अनेक शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड करतात. अशा प्रामाणिक कर्जदार शेतक-यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊ नये, म्हणून शासनाने त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जमुक्तीयोजनेच्या अंमलबजावणी मध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये, यासाठी राज्य शासनाने ‘महाआयटी’च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवली आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून, संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. या याद्या शेतक-यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, पात्र शेतक-यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकांमार्फत संदेश पाठवूनही सूचित केले जाणार आहे.
आधार प्रमाणिकरण अनिवार्य:
योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, पारदर्शक आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे. पात्र शेतक-यांनी यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी आपल्या आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ठ नंबरसह ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्जखात्याचे बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. ही माहिती योग्य असल्याची खात्री करून शेतक-यांनी मान्यता दिली, की शासनाकडून थेट कर्जमुक्तीची रक्कम शेतक-यांच्या कर्जखात्यात जमा होईल. एकवेळ समझोता योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांचा हिश्शाची रक्कम भरणे आवश्यक आहे, त्यानंतरच शासनाचा कर्जमुक्तीचा लाभ शेक-यांच्या कर्जखात्यात जमा होईल. यासाठी पात्र शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता योजनेस पात्र असणा-या शेतक-यांच्या थकीत पीक कर्ज खात्यांवर १ एप्रिल २०२६ ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या कालावधीसाठी व्याज आकारणी करू नये, असे आदेश शासनाने राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिले आहेत. या योजनेअंतर्गत ३० जून २०२५ रोजी थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पात्र पीककर्जे या योजनेसाठी ग्रा धरण्यात आली आहेत.
या योजनेत अल्पमुदतीची पीककर्जे तसेच पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित पीककर्जांचाही समावेश करण्यात आला आहे. कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा होण्यापूर्वी शेतक-यांच्या कर्जावर व्याज आकारल्यास त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. ही बाब लक्षात घेऊन पात्र शेतक-यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत थकीत पीककर्जाच्या रकमेवर व्याज आकारणी न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा बँकेकडून शेतकरी हिताला प्राधान्य
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नेहमीच शेतक-यांना मदत करण्याचे धोरण अवलंबले आहेत. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनही शेतकरी हिताला प्राधान्य दिले असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
















